शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

गोंदण

" कमुला पाहील का हो तुम्ही ? माझी कमु हरवली आहे, कमु.... तुम्ही पाहील का तीला ?" 
कोणीतरी माझा हात धरुन मला विचारत होते.
" च्या आयला मी तर स्वतःच हरवलो आहे. केव्हा पासून स्वत:चा पत्ता शोधतोय...पण सापडत नाही आहे. दुसर्यांना काय खाक शोधणार"  - मी स्वत:शीच.  तरीही न रहावून मी मागे पाहीले, एक आजोबा माझा हात धरुन विचारत होते.
" माझ्या कमुला शोधायच आहे हो,  आम्ही प्रभादेवीला जायला निघालो होतो.  हाच प्लॅटफॉर्म ....खुप पाऊस आला आणि सगळीकडे गडबड  झाली. गर्दीत चुकुन तीचा हात सुटला हो, आणि... आणि सगळीकडे गडबड झाली. तीला प्रवासाच काही समजत नाही.  आता कुठे सापडत नाही ती."  मला त्यांची दया आली. " आजोबा थांबा मी काऊंटर वरती चौकशी करतो. कॅमेरा वेगैरे असेल मी बघतो. " म्हणत मी काऊंटरकडे निघालो.

ते तिथुन ओरडुन म्हणाले " कमळाबाई विठ्ठल परब' सापडल्या का विचारा हं ! असेलच ती इथे कुठेतरी ! असेलच ती, माझी वाट बघत ! "


काऊंटर वरती चौकशी दरम्यान काही वेगळेच समजले.  ' त्या आजोबांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणे, रोज इथे येऊन येणार्‍या-जाणार्‍या जवळ अशीच चौकशी करत असतात . मग त्यांची मुल येऊन त्यांना घरी घेऊन जातात.'


मी चौकशी करुन मागे वळलो, खरच त्या आजोबांना हाताला धरुन कोणीतरी घेऊन जाताना दिसले.  मी खीन्न मनाने ट्रेन पकडली. कधी नाही ते , कोणाला तरी मदत करायला निघलो होतो. आणि काहीतरी वेगळेच समोर यावे.

" मी सुद्धा असाच हरवलो आहे, कोणीतरी शोधून दया रे "
माझ्या मनात विचार येऊन गेला.

*****


" जयु तु तयार आहेस का?  निघायचं ?"

" आई मला खरंच काही इंटरेस्ट नाही गं.  तुम्ही दोघे जातात का ?  तस ही तुम्ही आधीच पसंती दिली आहे. "
"  जयु please मला आता काही नाटकं नको. तुम्ही पसंती दिली आहे ! म्हणजे काय?  अरे,  आम्ही फक्त मुलगी छान आहे एवढेच सांगीतल.
४ वर्षे झाली आम्ही मुली बघतोय, पसंत करतो, पण तु प्रत्येक वेळी कारण देऊन विषय टाळतोस. तुला लग्न करायचंय नाही का, तसं सांग.  म्हणजे मी शोधा-शोध करणे धांबवते. "
" आई...... तु आता लेक्चर चालू करू नको. रोज रोज तेच-ते ऐकून कंटाळा आला आहे."
" अरे मी एकटी थकली आहे रे.  तुझे बाबा तर काही लक्ष देत नाहीत. अजुन किती दिवस मी सांभाळणार आहे सगळं ? तुला सांभाळणार कोणी तरी पाहिजे ना ?  तुझ लग्न झाल की, घोडं गंगेत न्हाल समजाचं."

'आईच्या तोंडाचा पट्टा चालू होता. आणि मी ही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.... नेहमी प्रमाणे. आता तीला कसं समजावणार की, एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेली की तीची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. स्वरा मला सोडून गेली.... किती आना-भाका घेतल्या होत्या दोघांनी. मी वेळोवेळी सगळी promise जपायचो, पण तीला तो गडगंज पैसेवाला मुलगा मिळाला, आणि ती खुशाल लग्न करून निघून गेली.  College पासून सुरू असलेल आमचं नातं...तीने क्षणात झिडकारल. आता विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. नात्यांवर आणि माणसांवरही.'

या माझ्याच विचारात मी गाडी स्टार्ट केली.  आई केव्हाची बाजूला येऊन बसली होती.

*****


निती माझ्या समोर बसली होती.  दिसायला ही बर्‍या पैकी. ती किती रूचकर स्वयंपाक बनवते.  सगळ्यांना संभाळून घेते.  वगैरे वगैरे ऐकुन मी जाम पकलो होतो.  इकडच्या तिकडच्या गप्पा, रहाण्या, खाण्या-पिण्याच्या गोष्टी चालू  होत्या.  माझं मन मात्र कुठेही लागेना.  नेहमी प्रमाणे हे न जुळलेलं लग्नं सुद्धा मोडण्यासाठी मला फक्त एक क्ल्यू पाहीले होता.  पण मनासारखे पक्कड काही मिळेना.  प्रोब्लेम असा होता की, याआधी पाहिलेल्या मुली मुंबई किंवा आसपासच्या परिसरातील होत्या.  तेव्हा बघण्याचे कार्यक्रम झाले तरीही मी, नंतर त्यांच्या ऑफिस मधून किंवा सोशल मीडिया वरुन काही ना काही माहिती शोधून काढायचो.  काही अगदीच शुल्लक कारणावरून देखील, मला ही मुलगी पसंत नाही.  असं सरळ सांगून टाकायचो.  काही कारणं तर मजेशीर असायची.


' जर स्थळ आमच्या नातेवाईक मंडळींच्या नात्यातील असेल. तर मग नात्यातील मुलगी नको नात्यामध्ये भांडणं होतात हे ठरलेले कारण.... केव्हा केव्हा तर मुलगी सारखी व्हाट्सअप वर असते म्हणून नको.... तिच्या ऑफिस मध्ये माहिती काढली तर समजल की ती भांडखोर आहे म्हणून नको..... 'स्वयंपाक अजून एवढा जमत नाही,' असे जर मुलीच्या घरातूनच समजले तर मग काय विचारता, तीला लांबूनच दंडवत असे.  गंमत म्हणजे, खूप सा-या मुली तर मलाच रिजेक्ट करायच्या. कारण माझा चेहरा बघून त्यांना एकंदरीत अंदाज यायचा, की हा किती इंटरेस्ट ने इथे आला आहे ते.  मग तर माझ्यासाठी सोन्याहून पिवळे.'


पण इथे गोष्ट वेगळीच होती.  निती नाशिक ची होती. मग परत मुंबईहून एवढ्या लांब येऊन तीची माहिती काढणे,  म्हणजे अवघड काम होते.  दुसर म्हणजे ती कोणत्याही नातेवाईकांची नातलग लागत नव्हती,  त्यामुळे ती आशा पण मावळली.  बाई सोशल मीडिया वर सुद्धा अमावस्या पौर्णिमेला दिसे, मग तो ही चान्स गेला.  आईच्या मते तर  निती म्हणजे, सद्गुण आणि सुंदरतेचा पुतळा जणू. मला शंका तोंडावर आली रे आली... की त्यावर आई कडुन शंका निरसन असायचेच.


खाणपाण झाल्यावर मला अस्वस्थ वाटू लागल... अगदी शेवटच्या क्षणाला आम्ही घरी जायला निघालो.  आणि मला एक परफेक्ट क्ल्यू सापडला. त्या बरोबरच संधी देखिल चालून आली. ' निघता निघता आम्हाला दोघांनाच बसून बोलण्यासाठी म्हणून थोडी स्पेस म्हणून सगळे बाहेर गेले. आणि इकडचे तिकडचे काही न बोलता मी डायरेक्ट विषयाला हात घातला...


" तुमच्या प्रोफाईल मध्ये सांगितले की इथे तुम्ही एकट्याच  राहता,  आणि बाकी तुमचे सगळे नातेवाईक बाहेर गावी असतात."

बहुतेक तीला हा प्रश्न अपेक्षित नसावा.  ती थोडी कावरीबावरी झाली. हे माझ्या लक्षात आले.  तरीही ती म्हणाली.
" हो बरोबर ! "
" पण मग तुम्ही सारख आजी-आजी करताय. आणि त्या ज्या आतमध्ये आहेत त्या कोण ?"  मी लगेचच पुन्हा प्रश्न केला.
'माझ्या प्रश्नासरशी ती दोन मिनिट शांत बसली.'
'इकडे मला जिंकल्याचा फिलींग येत होत.'
चला हिने तीच्या प्रोफाईल मध्ये दिलेली माहिती खोटी आहे तर.  आईला सांगतो,  एवढ्या छोट्याशा गोष्टी साठी ही आत्ताच खोटं बोलते. मग नंतर किती खोटं बोलेल.  आणि लग्नानंतर तिच्या आजीला सुद्धा सोबत घेऊन येईल.  कारण तसही तीला सांभाळणार इथे कोणीही नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे कारण कितीही शुल्लक असल तरीही मला क्ल्यू सापडला होता, आणि त्याचा वापर इथे कसा करायचा हे मला खुप चान्गल माहीत होत. राईचा पर्वत बनवण्यासाठी मला तेवढ कारण पुरेसं होतं.

मी परत खुळचटपणा सारखा प्रश्न केला.

" तुम्ही उत्तर दिले नाही?"

 आतमध्ये डोकावून पाहिले आणि ती म्हणाली.


" २००५ साली माझ्या ऑफिस च्या कामानिमित्त मी मुंबईला होते.  त्याच कालावधी मध्ये तिथे महापुर आला होता. तुम्हाला माहीत असेलच. या आजी मला CST ला जखमी अवस्थेत सापडल्या.  मी त्यांना डाक्टर कडे घेऊन गेले,  तर असं समजलं की डोक्याला मार लागल्याने  त्यांची स्मरणशक्ती गेली आहे.  मी स्वतः एक दोन पेपर अँड दिल्या,  CST ला एक आजी सापड्ल्या आहेत म्हणुन. त्या सोबत फोटो ही होता. पण काही चौकशी आली नाही.  त्यांना काहीच आठवत नव्हते.  एकतर यांना कोणीही नातेवाईक नसावे किंवा त्या पुरामध्ये त्यांचे काही बरेवाईट झाले असावे.  मुख्य म्हणजे हल्ली अशा  म्हातार्‍या आई-बाबंची जबाबदारी घेण्यासाठी मुलंही तयार नसतात.  अजुनही बर्याच शक्यता असू शकतात...


शेवटी माझ्याकडे पर्याय राहिला नाही, आणि माझे मुंबई मधील कामही संपले होते.   म्हणून मी त्यांना माझ्या सोबत इकडे घेऊन आले. "


ती बोलत होती आणि मी एकटक तीच्याकडे बघत होतो.  काय बोलावं मला सुचेना. "साल्या इथे तर सपशेल हरलास तु...."  मी एवढेच, पण मनातल्या मनात म्हणालो.

ती तर बोलता बोलता फार सिरीयस झाली होती. मग उगाचच काहीतरी विचारायचे म्हणून परत प्रश्न केला.
" तुम्ही पोलिसांना का कळवले नाही ? त्यांची नक्कीच मदत झाली असती."
" त्यांना काहीच आठवत नाही हो !  अँड तर मी ही दिली होती. पोलीस काय करणार ?  फार तर त्यांनी या आज्जीना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवले असते. आणि हे पाप माझ्याने पहावणारे नाही."
नितीच्या या वाक्याने मी खजील झालो. आणि निरुत्तर ही.

*****


आईच्या मांडीवर डोक ठेवून मी झोपलो होतो.  लग्नाला एका दमात होकार दिला. आईला केवढा आनंद झाला. आणि आश्चर्य ही. ती मला राहून राहून सारखे एकच प्रश्न विचारत होती.  " जयु... मुलगी नक्की पसंत आहे ना ? की मी सारखी सारखी मागे लागत असते म्हणून होकार दिला आहेस."


मी हो म्हंटले.

" आई मला तीला भेटायचं आहे ! "
" बर मग कुठे भेटायच म्हणतोस. तु नाशिक ला जाणार आहेस, का नितीला इकडे बोलवून घेऊ?"
" तीला बोलाव CST ला.  सोबत आजींना घेऊन यायला सांग."
" CST ला का रे ? डायरेक्ट घरी येऊ दे ना !"
" आई तु पण ना.... CST ला मी जाईन आणि त्यांना घरी घेऊन येईन."

आईचा आंनद गगनात मावेनासा झाला.  तीने लगोलग कॉल करून निती ला बोलावणं पाठवलं सुद्धा.

' खरच.... निती पेक्षा चांगली मुलगी मला मिळाली नसती.  आपण रक्ताच्या नात्याला तेवढे महत्व देत नाही.  कुठच्या कोण, त्या आजींचा संभाळ करणारी निती म्हणजे खरच आई म्हणते तशी, नात्याना महत्च देणारी आणि मानुसकी जपनारी अशीच होती.

काही वेळा गोष्टी आपल्या नजरेसमोर असुनही आपण दुर्लक्ष करतो. आपण आपल्या भावनांना एवढे कवटाळून बसतो की, आपल्या नजरेसमोरील कित्येक चांगल्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. आपण जे शोधत आहोत, ते हेच आहे हे समजायला हवे.'


माझ्या बाबतीतही असेच झाले.

त्या दिवशी नितीच्या घरातुन निघता- निघता मी त्या आजींच्या पाया पडलो.  डोक्यावर त्यांचा आशीर्वादाचा हात होता.  सहजच उठता उठता त्यांच्या हाताकडे लक्ष गेले, त्यांच्या उजव्या हातावर एक गोंदण कोरलेले होते.  आणि त्यावर नाव होते. 'कमळाबाई विठ्ठल परब'....जुनी गोंधणाची संस्कृत इथे कामाला आली आणि मला कमळाबाई परब सापडल्या.

मागे स्टेशन वरती भेटलेले आजोबा आठवले.  "माझी कमु हरवली आहे हो! "...म्हणत ते एवढी वर्षे त्यांच्या कमुचा शोध घेत आहेत.  त्या ७० पार आजोबांच्या आशेला एक कारण होते. ते म्हणजे त्या आजी.  म्हणूनच तर त्या दिवशी स्टेशन वरती त्यांची आणि माझी भेट झाली असावी.


आता एक गोंदण मी माझ्या मनावर कायमचे कोरुन ठेवले.  ते म्हणजे जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि जे नशिबात नाही,  त्याचा विचार करून शोक करण्यात काहीही अर्थ नाही.



समाप्त.

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

राहिल्या त्या काही आठवणी (कोकण) - १

कोकण म्हणजे ओल्या मतीचा गंध,
कोकण म्हणजे हळुवार मनाचा बंध,
कोकण म्हणजे कोवळी पहाट स्वच्छंद,
माझ्या मनातील कोकण म्हणजे... एक लहर बेधुंद ॥
हिरव्यागार रान पसार्‍याच्या मधुन कुठुन तरी सुर्य नारायणाचा चोरटा कटाक्ष पडत होता. त्याच्या उदयाची चाहूल होती ती. त्या कटाक्षाने वातावरणात पसरलेले धुके किंचीतसे दूर पळू लागले होते. सळसळत्या गवतपात्यावरील दवबिंदू चमचम करत होते.
कुणीतरी विस्तवावर फुंकनीने फुऊsssss, फुऊsss,,,, फुऊss,,,, अशी फुंकर घाली त्याचा आवाज, आणि त्यातच भर म्हणुन, मधुन येणारा जळक्या कोर्‍या चहाचा गोडूस वास.... चालत असताना बाजूला रस्त्यालगत असणार्या, एका घरासमोरील खळ्यात माझी नजर गेली. मस्त शेणाच्या सारवणावर, राखेच्या करड्या भुकटीने झरझरती रांगोळी आकारली होती. कोण्या साठीपार आजीचे थरथरते हात या मागे असावे. (लाकुड जळाल्या नतर जी सफेद, करडी भुकटी मागे शील्लक राहते, त्याचा पुर्वी रांगोळी म्हणुन वापर करत असत.) पाय वाटेचा रस्ता अगदीच कच्चा होता. गावच्या लोकांच्या जीवनात जे खाचखळगे असतात आणि एवढ्या खाच-खळग्यातही ते आनंदी रहातात याच जणू प्रतिक म्हणजे हे रस्ते. मातीची नुसतीच भरणी, कधी ओभड-धोबड दगडांची चादर, तर कधी अर्ध्यातच पसरवलेले खडी आणि डांबर. या रस्त्यांची कहानीच वेगळी.

'गाव म्हणजे गावच । शब्दात मांडणे कठीण. दुसरे, तीसरे काही शब्द याला लागू होत नाहीत.'
सकाळचा प्रवास, छे... सकाळ कुठली पहाट, पहाटेचा पाच साडेपाचचा प्रहर. नुकताच बसचा प्रवास करुन, शेवटी आजुबाजुच्या वातावरणाचा कानोसा घेत, आम्ही आमच्या गावच्या मुख्य रस्त्याला लागलो होतो. दुर शेतीबांधा पलीकडे, झरझर वाहणारी आमची थोरली नदी मंजुळ गाणे ऐकवत होती.
तर दुर डोंगर कपारीतुन म्याओssss,,,, म्याओ sss,,,, म्याओss,,,, असा मोराचा आवाज कानी पडत होता.
खडबडीचा मेन रस्ता संपवून, आम्ही चिखल मातीच्या पाऊलवाटेला लागलो. पाऊलवाट असली तरी गावातील लोकांनी मोठाले दगड वगैरे रचुन ही वाट चालण्यायोग्य केली होती हे एक बरी झाले. मध्येच एखादे बेडकाचे पिटुकले पिल्लू टुनकन उडी मारुन इकडुन तिकडे जाइ. ईथुन चालताना आपला झगा संभाळण्यासाठी मला मात्र कसरत करावी लागत होती. गुडघाभर वाढलेल्या गवताने, लवलव करत माझ्या पायात मस्त फेर धरला होता. आणि त्यावर भरभरुन पसरलेले दवाचे थेंब, माझा पायघोळ झगा कधी भिजवून गेले मला समजले देखिल नाही. बाबांची पॅन्ट् देखिल पायालगत थोडी भिजून गेली होती. केव्हा एकदा घरी पोहोचू असे झाले होते.
आता रस्त्याचा दुतर्फा घरे दिसू लागली, आणि मला हायसे वाटले. येणार्‍या जाणार्‍याच्या स्वागता साठी जणू ही घरे प्रथमदर्शनास सज्ज झाली होती. बाजुच्या वेणू काकुच्या कौलारू घरावर धुराची वलय चढत होती. वाटे पळत - पळत जाऊन एक घोट कोरा चहा मागावा..... थोडीशी चहापावडर, साखरेचा किवा गुळाचा नुसता पाक, मापक प्रमानातच पाणी आणि चहाची हिरवी पात, अद्रक असेलच तर फक्त नावाला.... असा कोकणी मानसाच्या गोड स्वभावाप्रमाने गोड चहा... आहा । पहाटेची सुंदर सुरुवात अजुन वेगळी ती काय असणार ? आणि लाल तांदळाचे दोन मऊ-लुसलुशीत घावणे या चहा बरोबर न मागता मिळत, त्याचा आनंद आगळा-वेगळाच.
पण अशा गोड विचारा मध्ये ही, मी पाय ईकडचा तिकडे करायला तयार नव्हते. कारण मला जास्त ओढ होती ती माझ्या स्वतःच्या घरी पोहोचण्याची.


थोड पुढे गेल्यावर बाजुच्या भात शेतातुन बुजगावणी लावलेले दिसत होती. हिरव्या पिवळ्या शेतामध्ये साधारण आठ-दहा हाताच्या अंतरावर एक- एक असे बुजगावणे लावलेले असत. त्याचे पाय म्हणून दोन जाड बांबू रोवले जात, वरती सुक्या गवताच्या पेंढीवर स्त्री किवा पुरुषाचे रंगीत- संगीत कपडे चढवून देत, आणि त्याचे तोंड म्हणुन त्यावरती घरचाच एखादा फुटका माठ पालथा घातला जाई. त्या माठावर जळके लाकुड विझुवन तयार झालेल्या काळ्या कोळश्याने मस्त दोन डोळे, मधोमध नाक, तोंड .... तसेच तो पुरुष असेल तर जाडजूड मिश्या.... असा एकंदरीत त्या बुजगावण्याचा अवतार असे.
तेवढ्यात पाठीमागे कुठेतरी घुंगूरांचा आवाज ऐकु आला म्हणुन मी त्या दिशेने वळले. बाजुने गजुकाकाची बैलगाडी दिमाखात निघुन गेली. वर जाता-जाता " चाकरमाण्यानूssssss , आलाव काय ? मग किती दिसाचा मुकाम ? " अशी जुजबी विचारपुसही त्याच्याकडून झाली. त्याच्या गाडीची बैलजोडी ' सोन्या आणि मोत्या' मला फार आवडे. गळ्यातील सुपारी एवढ्या घुंगूरमाळचा रुणझुण आवाज करत, आणि ती लाल रंगवलेली टोकदार शिंगे दाखवत ते मस्त ऐटीत चालत. विषेश म्हणजे एवढ्या पहाटेच्या धुक्यातही दुरुन सुद्धा उठून दिसत, एवढे पांढरेशुभ्र बैल.
उठा उठा हो साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥ १ ॥
'उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ॥
जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया ॥ २ ॥

घंटानादाच्या तालावर असा अभंगाचा आवाज गाव मंदिरातुन येत होता. मंदिरामध्ये सोनार मामांनी काकड आरतीची तयारी केली होती. म्हणजे आम्ही आमच्या वाडीच्या अगदी जवळ आलो होतो तर...
मला आठवले.....आषाढ शुद्ध एकदशी च्या दरम्यान काकड आरतीची सुरुवात होते. जेव्हा आजोबा मंदीराचे पुजारी होते. तेव्हा काही वेळा, मी ही आजोबांच्या बरोबर भल्या पहाटे काकड आरतीसाठी जायचे. ‘ ‘त्रिगुण काकडा द्वैतघृते तिंबिला ।’ काठीला चिरगूट गुंडाळून त्यावर तेल ओतून पेटवलेली मशाल म्हणजे काकड. पाहाटे स्नान वगैरे करुन, हा काकडा हाती घेऊन कुडकुडत आम्ही मंदीराची वाट धरायचो. हरिनामाचा गजर करत त्या सावळया माऊलीस ऊठवले जाते. दही-दुध-तुप-लोण्याने अभिषेक करुन विठ्ठल- रखुमाईस अंघोळ घातली जाते. याच दही, दुध, तुपामध्ये मध घालुन पंचामृत केले जाते. विठ्ठल- रखुमाईस तलम रेशमी वस्त्रे आणि अलंकार घातले जातात. हळद, कंकू, गंध, फुले, तुळशी, ऊद, बेल, उदबत्ती, निरांजन, कापुर वगैरे वापरुन मस्त प्रसन्न अशी सांग्रसंगीत पुजा असे.

मला काकड आरती आवडण्याचे अजुन एक कारण म्हणजे, देवाला दाखवण्यासाठी बनवला जाणारा नैवेद्य. गावठी मऊसर शिजवलेला तांदूळ त्याच उभा-आडवा चिरलेला गुळ, असेलच तर एखादीच अखंड वेलशी..... अशी भरपुर प्रमाणात दुध घालुन खीर केली जाते. खीर तयार झाल्यानंतर शेवटी त्या मध्ये हलक्या हातानेच, एक छोटासा लोण्याचा गोळा वरुन टाकला जातो. पंचामृत आणि त्या बरोबर ही खीर खाण्यासाठी आम्ही सगळेच उतावीळ असायचो. घरी आईने केव्हा अशी खीर बनवली तरी नैवेद्याच्या खीरीची चव काही औरच.... त्यास कशाची ही सर नाही.
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥

माझ्या मनात काकडा आरतीच्या कितीतरी आठवणी तरळत होत्या, आणि या आठवणीच्या साथीने चालत-चालत मी आमच्या घराच्या खळ्यापुढील पायरीवर पाऊल ठेवले. आम्ही इथवर केव्हा पोहोचलो हे समजले देखिल नाही.
----------
काही ग्रामीण शब्द-
शेण - गोबर
गवताच्या पेंढीवर- वाळलेला गवताचा छोटा भारा
खळ -अंगण

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

शतशब्दकथा- whatsapp



अगं !
मी आणि माझा नवरा म्हणजे ना, अगदी मेतकूट.....
एकमेकांना न सांगताच, डोळ्यांची भाषा ओळखणारे. एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीला, आमचा खंबीर सपोर्ट असतो.
आमचे नाते म्हणजे एक अतुट बंधन आहे हो. आणि माझे पती दिपक  म्हणजे तर प्रेमाचा सागर.
आमच्या आई तर म्हणतात, "आम्ही दोघे म्हणजे, लक्ष्मी नारायणाचा जोडाच."
खरंतर तुला सांगते, 'एकमेकांचा मान-सन्मान ठेवला, की नातं आपोआप फुलत जात बघ.'
चल उद्या बोलू . आता आम्ही दोघे मुव्ही पाहण्यासाठी थोड बाहेर निघालो आहे.
बा...बाय डियर.
सेंड !
" हुश्श्य ! झाला एकदाचा रिप्लाय करून."  Wink
हातातील मोबाईल टेबलवर ठेवून प्रीती उठली.
" दिपूsssss ! काय करतोस एवढा वेळ ???
आज तरी, तुझा चहा वेळेवर मिळेल का " ?

😂😂😂
(whatsapp ?)

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...