कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ जुलै, २०२०

मिरगाचा पाऊस

                         




"निमा! तांदळाची भाकर करते ना गआणि हो... थोडं सुक्या करदीच कालवण त्याबरोबर खाऱ्या बांगड्याच तोंडीलावणं पाहिजेच. नाहीतर जेवायची नाही हो ती."    अप्पांनी हसत-हसत फर्मान सोडला होता.

"होय. आप्पा सगळं करते."    निमाही रोजच्याच सवयीप्रमाणे बोलून गेली.

"आणि ते ..."

"हो. हो... समजलं आप्पा. करदीच्या कालवणात कच्या कैरीच्या चार फोडी टाकायच्या कोकम नाही. त्याने चव बिघडते. बरोबर ना?"

तिच्या या वाक्यावर दोघेही मनसोक्त हसले.

"कैरी नसेल तर आंब्याची वाळलेली दोन आमसूल टाकायची. झकास बेत होईल."    म्हणत आप्पा उठून पडवीत आले. अंगणातून समोरच्या बेड्याची टेहळणी करत त्यांनी नकारार्थी मान डोलावली.

जेमतेम अर्धी घटिका सरते न सरते तोच त्यांनी पुन्हा थरथरत्या पावलांनी स्वयंपाक घरात डोकावत कानोसा घेतला.  "निमा! उद्याच किश्याला चढणीचे मासे सांगून ठेवतो. दोन दिवसात आणून देईल तो. करशील ना?"   

"हो आप्पा करेन. माईंना मासे खूप आवडतात ना... माहीत आहे मला."

"तिच लुगडी-चोळी आणि गोधड्या वगैरे सगळं चांगलं धुवून ठेवलंस काय?"

"आप्पा अहो सगळी तयारी झाली... सकाळपासून दाराला डोळे लावून आहात. आत्ता येईल..आत्ता येईल म्हणूनथोडं आराम करता का?"

निमाने आराम खुर्ची समोर करतआपल्या हातांचा आधार देत त्यांना बसवले. त्यांच्या हातातील लाकडी काठी खाली ठेवून खांद्यावचा छोटासा हातरुमाल घेऊन कपाळावरचा घाम पुसला.

आप्पांचे मात्र त्यांच्या जाडजूड चष्म्याच्या कडेतून दाराकडे लक्ष होते. "बघ जरा पंचांगात... मिरग चालू झालं नाउद्या नक्षत्र बदलतंय. आज आलीच पाहिजे ती.... आलीच पाहिजे."

नेहमीप्रमाणे त्यांची एकट्याचीच बडबड चालू होती. सारखं-सारखं दाराकडे बघून त्यांची बेचैनी वाढत चालली. ते पाहून निमाचे डोळे पाणावले. त्यांच्या नकळत तिने पदराने डोळ्याचा कडा टिपल्या आणि ती स्वयंपाक घराकडे वळली.

'आज दोन आठवडे हे असच चालू होत. झालं उद्या पासून सगळं ठीक होईल. कसबस अजून एक दिवस ढकलायचा होता. माईंचं लुगडी-चोळीदोन जाडजूड गोधड्या आणि पानांची चंची सार साहित्य उचलून लाकडी पेटाऱ्यात भरत तिने पेटारा बंद केला.

"व्यवस्थित घडी करून ठेवलं पाहिजे हो. परत पुढच्या मिरगात काढावं लागेल." स्वतःशीच पुटपुटत तिने दोन ताटं वाढायला घेतली. आणि बाहेर पावसाची रिपरिप चालू झाली. खिडकीतून पावसाकडे बघत तिने एक समाधानाकारक उसासा दिला. " वेळेवर आलास रे बाबा! नाहीतर माझ्यावर धर्मसंकट कोसळले असते."  असे मनातल्या मनात म्हणत तिने चौरंगावर एक ताट लावून आपांना आवाज दिला.

"आप्पा चला जेवून घ्या."

"जेवायला काय वाढ़तेस. ती येईल एवढ्यात मग एकत्र बसुया ना."

"आप्पा त्यांना उशीर होईल. त्या संध्याकाळीच येतील बहुतेक. बाहेर पाऊस बघा काय आहे तो."  बाहेरच्या पावसाकडे बोट दाखवत निमाने त्यांची समजूत काढली.

"असं कसं? 'यंदाच्या मिरगात तिला सोडायला येतो. 'असं बोलला ना बाळ्या. मग यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. घेऊन कशाला गेला? का घेऊन गेलातेही मला न विचारता."    आपांचा पारा अचानक चढला होता. वाढलेले ताट बाजूला सारून ते अचानक उठून दाराच्या दिशेने निघाले.

"आप्पा शांत व्हा. येतील ते संध्याकाळी माईंना घेऊन. पाऊस जास्त आहे आणि आपल्या गावाला यायला एक रस्ता. त्यावरील लाकडी साकव देखील डळमळीत झालाय. थोडा पाऊस वाढला तरीही तो बंद करून ठेवतात. त्यामुळे उशीर झाला असेल."  

निमाने त्यांना हाताला धरून पुन्हा आत आणले. पण आप्पा मात्र आता खूपच चिडले होते. त्यांची थरथर वाढली. कपाळावर भर पावसात घाम फुटला होता. श्वसनाचा वेगही वाढू लागला होता.

"संध्याकाळी येईल म्हणतेस. अजून राखण द्यायची बाकी आहे ना. आज मिरगाचा शेवट ग. काहीही करून आजच संध्याकाळी राखण द्यावी लागेल. आलाच पाहिजे.... आलाच पाहिजे. कोंबडा कोण कापणार आणि रसरशीत काळ्या वाटणातली गावठी कोंबडी खावी तर माईच्या हातचीच. वर्ष सरले नातिच्या हाताचा रस्सा चाखून. "

असबंध बडबड करून आप्पा पुन्हा भूतकाळात शिरले. आणि नेहमीप्रमाणे त्याच गोष्टीचा फायदा घेऊन निमाने त्यांना ताटातले चार घास भरवले देखील. नाहीतर जेवणाची आणि त्यांची गाठ पडणे मुश्किल व्हायचे. त्यांचे रिकामे ताट आणि स्वतःचे रिकामे पोट, तरीही ती समाधानाने आत वळली. मिरग आले कि तिच्या कितीतरी आठवणी जाग्या व्हायच्या. कितीतरी जखमांच्या खपल्या निघायच्या. पंधरा दिवसाच्या या नक्षत्राने तिला आयुष्यभर पुरेल एवढा पाऊस दिला होता. त्यात होते ते काठोनकाठ भरलेले दुःखओसंडून वाहणाऱ्या वेदनाआणि भळभळणारी जखम. याच विचारांत ते रिकामे ताट तिने घासून टाकलेजसे आपले रिकामे आयुष्य ती रोज घासायचीपुन्हा नव्याने चकचकीत करण्यासाठी.

एवढ्यात कसल्याश्या धाड धाड आवाजाने तिची तंद्री भंग झाली. हातातले भांडे तसेच टाकून तीने माजघराच्या दिशेने धाव घेतलीआणि समोरच आप्पांना जमिनीवर कोसळलेले पाहून तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले. 

"आप्पा...आप्पा उठा! काय झालं?"

कसेबसे उठवण्याचा प्रयत्न करत तिने बाजूच्या तांब्यातील थोडे पाणी त्यांचा तोंडावर शिंपडले. परत हृदय विकाराचा झटका आला की काय?  या विचाराने तिच्या पोटात गोळा आला होता. नक्की काय करावे तिला कळेना म्हणून शेजारच्या तात्यांना आवाज द्यायाला ती उठलीएवढ्यात आपांनी तिचा हात घट्ट पकडला होता. त्यांचे पांढरेफट डोळे तिच्यावरतीच रोखलेले होते.

"निमेबाळ्याने तुझ्या आयुष्याची माती केली पोरी. माझा लेक असला म्हणून काय झालं ग. शहरात दुसरा संसार थाटून मोकळा झाला... आणि तू इथेच राहिली आमची सेवा करत. एवढं करून त्याच समाधान होईना की कायते त्याच्या पोराला सांभाळायला माझ्या माईला घेऊन गेला... भाड्???"

एक सणसणीत शिवी हासडून आप्पा पुन्हा शांत झाले. 

"मी मिरगाची वाट बघत बसलो अन कळलं की चार महिने झालेमाई केव्हाचीच मला सोडून गेली. कायमचीच. नालायकाने कळवलं पण नाही... शेवटची भेट पण होऊ दिली नाही."  आप्पा बोलता बोलता रडू लागले. त्यांना दोन वर्षापूर्वीचे सारे काही आठवले होते. ते ही स्वतःहून...

'निदान पुढच्या मिरगात तरी माईच्या येण्याची आस धरून बसणार नाहीत ते. आणि मला पण आता खोट बोलण्याची गरज नाही.या विचाराने निमाला हायसे वाटले.

"पोरी बाळ्याला देव कधीच माप करणार नाही.कधीच." म्हणत आप्पा पुन्हा मूर्च्छित पडले.

*****

दुपारपासून आप्पांची तब्येत बिघडत चालली होती. रात्रभर निमा त्यांच्या बाजूला बसून राहिली. सकाळी केव्हातरी निमाचा डोळा लागला होता. उठायला खर तर फारच उशीर झाला, पण सतत कोs, कोss, कोss, कोssss करून ओरडणाऱ्या कोंबड्यांच्या आरवण्याने ती उठली. चुलीवर चहासाठी पाण्याचे आंदन ठेवून ती परसात वळलीतिला आश्चर्य वाटले कारण समोर आप्पा आपल्या थरथरत्या हातानी पाण्याच्या बंबाखाली सरपणाचा जाळ करत होते. धुराचे लोट हवेत वरती विरून जात होते. 

"आप्पा लवकर उठलातकसं वाटतंय आता ?"   निमा दोन सुकी लाकडं पाण्याखाली सरकवत त्यांच्या बाजूला जाऊन बसली.

हातातील मिसरी बोटाने चोळत आप्पांनी नकारार्थी मान डोलावली. "यंदाच्या वर्ष्याला पण बाळ्याने फसवलं ना ग. काल संपला मिरग... पण माझ्या माईला घेऊन आला नाही तो."

त्यांचे शब्द ऐकताच ती मिनिटभर सुन्न झाली. स्वतःला सावरत, "येतील हो पुढच्या मिरगात."  म्हणत तीने डोक्याला हात लावला.

"काय झालं ग?"  तिचा तो उतरलेला चेहेरा पाहून आप्पांनी प्रश्न केला.

"काही नाही हो. आज सकाळ सकाळ पावसाळा सुरुवात झाली बघा."  म्हणत तिने बाहेर छपरावरून खाली मागीलदारी पडणाऱ्या जलधारांकडे बोट दाखवले. स्वतःचे दुःख बाजूला सारून ती पुन्हा एकदा पुढच्या मिरगाच्या प्रतीक्षेसाठी सज्ज झाली. कारण माईला भेटण्याची आप्पांची आस काही केल्या सरेना. त्यामुळे आता परत पुढच्या मिरगाची वाट बघणे आलेच.


पुर्वप्रसिद्धी - "रेशिमधारा"  पावसाळा ई विशेषांक २०२०  

https://drive.google.com/file/d/1axoKzr6csU5YUmYhOGrm7wk_BtzyCjvM/view?usp=sharing

रविवार, २२ मार्च, २०२०

संतोस



णखणीत आवाजात दोन टाळ्या वाजवुन संतोषने उजवा हात पुढे पसरला. डाव्या हाताने उगाचच पदराला चाळा करत, तिचे ते बायकी नखरे चालू झाले. " ओय्य चिकने ! ए मामा , चल दे दे फटाकसे ! भोत दिनो के बाद आयी मै. चल दे दे !" लालभडक बांगड्यानी भरलेला तो हात, नुसताच राकट आणि रुक्ष... स्त्रिपणाचा जरा ही लवलेश नाही.
" किधर किधर से आते है, भगवानने हात पॉव तो दिये है कमाके खाने को, यहा हमने क्या ठेका लेके रखा है सबका. " संतोसचा हात आपल्याच दिशेने येत आहे हे पाहुन, तो घाणेरडा स्पर्श टाळण्यासाठी सुधावाण्याने काहीतरी कुरकुरत २ रुपयाच एक नाण तिच्याकडे भिरकावलं.
" हु मामा! तुम भी नॉ... दो रुपयेसे क्या होता है रे ? अच्छा चल. टाटा." परत पदराशी चाळा करत , लटकत मुरडत ती पुढ्च्या दुकानाकडे वळली. पण दुकानदाराने तिच्या तोंडावरतीच शटर डाऊन केले होते. अजुन दोन-चार टपर्या आणि दुकाने ढुंडाळत, दोन तास रस्ता पायदळी तुडवत, तिने रेल्वे फाटकाचा रस्ता पकडला. आता चांगलीच काळोखी रात्र झाली होती.
" दोन...पाच...विस... दोन... दोन... दोन...पाच....दहा..., ....., ....,,.... कुल मिलाकर ८७ रुपया. " हातातले पैसे मोजत ती भरल्या आभाळाकडे बघु लागली. तसाच फुटपाथवर टाकुन दिलेला कडकडीत, अर्धमेला देह. " आयेगा मजा अब बरसात का, तेरी-मेरी दिलकश मुलाकात का....लाल्ल्ल्ल ला ला लाला लाल्ल्ल्ल्ल....आ आआ आआआ."
" ओ संतोस इधर क्या करती रे ? चल तिल्ली बझार. उधर बडा गिर्‍काईक मिलेगा. थोडा मस्का लगानेका... बझार बडी तेजी मे है हा आजकल."
सलमाच्या आवाजाने संतोष फुटपाथवरुन उठली , आणि काहितरी अचानक आठवल्यासारख झपझप पावले टाकत, रेल्वे पुलाच्या बोळाकडे निघाली.
" कितनी बार बोला पर तू नही सुनेगी. मै तो चली." म्हणत सलमाही चुपचाप चालू पडली.
ती निघुन गेल्याची शहानिशा करुन संतोस ने पुन्हा चालायला सुरुवात केली. चार पडक्या-झडक्या अर्धवट बांधकामाच्या ईमारती मागे सोडुन तिने एक निसरडी जागा गाठली, आणि आजुबाजूचा कानोसा घेऊन एक कचरा कुंडीच्या इथे येऊन टेहळनी सुरु केली. अगदी भयान रात्र त्यात हे निर्जन ठिकाण, कोणी चिटपाखरु आसण्याची शक्यता कमीच... हे पाहुन तिने दोन ढेगांवर असणार्या एका खोपटाकडे धाव घेतली.
ररर्र असा पत्र्याचा कर्कश आवाज. खोपटं कसलं, चारी बाजुला लहान मोठ्या आकाराचे आणि काळे-कुट्ट पडलेले पत्रे फक्त नावापुरतेच आधाराला उभे होते. आत दोन अ‍ॅल्युमीनीअमच्या काळपट ताटल्या आणि एक पितळी तांब्या. ठिकठिकाणी ठिगळ पडलेली एका मळक चटई. केसाचा गंगावन, हातातल्या भाराभर बांगड्या, गळ्या-कानातले भडक नकली दागीने तिने ओरबाडून काढले. तोंडावर सपासप पाण्याचा मारा करुन ती त्या पत्राच्या शेडला टेकली. बसल्याक्षणी तिने कापडे काढुन एक लुंगी आणि लाल बनीयान अंगात चढवली. आता 'ती' चा 'तो' झाला होता.
त्या हालचालीची चाहुल बाजुला झोपलेल्या दोन जिवांना लागली होती. उपाशी पोटाने झोपलेली ती दोन लहान लेकर आत्तापर्यंत उठली आणि संतोस ला बिलगली.... " बा आला...बा आला... बा मना भुक लागले रं... खायाला काय आनल ? दी ना !" संतोस ने येताना बरोबर आणलेलेल्या खाण्याच्या पुड्या त्यांच्या पुढे ठेवल्या. भुकेली मुले त्यावर तुटून पडली होती. पाच एक मिनिटांत सगळ्याचा फडश्या पडला, हे पाहुन संतोसच्या मनात एक विचार आला, " या अनाथ दोन जिवासाठी तर रोज टाळ्या वाजवत दारोदारी भटकतो मी. नाहितर भिक मागुन दिवसाला मिळणार्या पाच- दहा रुपयात मस्त जगत होतो."
बाजुला असलेल्या प्लॉस्टीकच्या भांडयातले पाणी घटाघटा पिऊन संतोष ने संतोषाने आपले डोळे मिटले.... उद्या परत 'तो' ची 'ती' होण्यासाठी.

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

रखमा...



' साथीच्या रोगान विठोबाचे निधन झाले आणि  सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं-  वर्षाचा म्हादु आणि - वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेचीपोटा-पाण्याची ही सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमीनीचा फक्त एक तुकडा 'मारुतीचा माळ', तो पण रेताड भाग, अगदी डोंगरा लगतचा ...पीक आलच तर अगदी जेमतेम... अन त्यावरही मानसातल्या कोल्ह्या, लांडग्यानची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकावण्यासाठी हे लोक आपापल्या परिने प्रयत्न  करत असत. या सगळ्यांना पुरून उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती. नवरा अकाली गेल्याचे दुःख होतेच, तरीही आपल्या दोन लेकरांकडे बघून त्या मारुतीरायाला साकड घालत, ती एक-एक दिवस ढकलत होती. '


आषाढ मध्यावर आलापेरणीची हिरवीगार पीकही मळीमध्ये दिमाखात डोलू लागली, आणि लावनीची लगबग सुरु झाली होती.

"
आज उजाडल्या पासनं वातावरण पावसाच हाय !  ढग फुटल्यागत कोसळतोय ... आकाडाचा पाऊस लावनीला उमद्या जोमान फुलवतो." रखमा नुकतेच नेसुन आलेले लाल-निळे पातळ चापुन-चोपुन निटनेटके करत, घराच्या दारातून हलकेच डोकावत बडबडत होती.

"
माय  यकटीच काहुन बडबडते गं ?" गंगी तिच्याकडे गमतीने पाहुन विचारु लागली.

"
आज पाऊस मोप हायदोग पन शाळला जाऊ नगा. म्या मारुतीच्या मालावर जाते, आन भात लावुन घेते. आज लावनी केलीच पायजे."
 हातात मातीचा दिवा आणि अगरबत्ती घेऊन ती चुलीकडे वळली . पेटत्या जाळावर अगरबत्ती टेकवून दिवा लावत-लावत पुन्हा देवाकडे वळली.... पुढ्यातल्या बाप्पाच्या फोटोंपुढे ओवाळणी करत तिने हात जोडले.

"
माय मी बी येव काय ? "    छोटा म्हादु तिच्या पदराला धरुन खेचत मागे लागला.

"
सोन्या एकच विला हाय ना... मग तु काय करणार येऊन... पाऊस बी मोप पडतोय. भिजलास शीक पडशील, गंगी शालेत बी जाऊ नग हा... आज घरातच थांबा."
हातातला विळा दाखवर रखमाने त्याची भाबडी समजुत काढली. आणि ते समजुदार लेकरु ते सुद्धा गप्प बसले.
फाटक-तुटक ईरल तेवढच पावसापासून आधाराला होते... ते हातात घेऊन, भाकरीची टोपली सोबत घेऊन तिने दार लोटलेडोक्यावरचा पदर सावरतं , ऊजाड कपाळाने ती पहिल्यांदाच घराबाहेर पडत होतीओल्या झालेल्या डोळयांच्या कडा लपवण्यासाठी तिने पाठमोरीच हात करुन मुलांचा निरोप घेतला.

सदा भाऊ शेत नांगरणी करत होता. भारी रबरबीत कमरेएवढ्या चिखलात शेतीची लावनी रंगली होती.  आणि भरला पाऊस बघुन किसनी माळीन झोकात गाणं गात होती. तिच्या गाण्याबरोबर काम करण्यासाठी हुरूप आला होता.

" हिरव सोनं पिकल या
शेतात नागर रुतल या
चल राजा ररर ,चल सर्जा
लावनीच गान सुचल या
आता लावनीच गान सुचल या !" 

रखमाकडे पाहुन सगळ्यांचेच डोळे मोठे झालेहि एकटी शेत लावणार आणि नांगरणी कोण करायचे ? ' हा प्रश्न सदा भाऊच्या अगदी तोंडावर आला होतापण तिची विचारपुस करण्यास मात्र कोणी ही धजेना. शेवटी पुढे जाता-जाता  राहवून रखमानेच तोंड उघडले.
"भाऊ झाली काय नांगरणी... चांगलाच जोर लावलाय म्हणायचा ! "

एवढ्यात किसनी माळीन तोंड वर करुन बोलली.
"रखुताई ! सरासरा नांगरणी करुन, कमरेपातूर रबरबीत चिखल तयार पायजे, तवा कुठ सोनं पिकतया ! ह्या बाई मानसाच काम न्हाय . तू यकली कस करायची समद ? "

"
वयनी जमत का ते तर बगु. बाकी समदी माझ्या मारुतीरायाची किरपा हाय म्हणा, तो आडत्याला वर काडतुया बगा. " रखमा शेताकडे वळली. कमरेचा विळा बांधावर ठेवुन तिने मारुतीरायाला हात जोडले.

"देवा तु गोरगरीबांच्या हाकला धावतुयाकाटाकुट्यांपासुन समद्याच रक्षण करतुया , गुराढोरावर तुझी आशीच किरपा ठेव. आज पासुन लावनीला सुरुवात करते , कष्ट कराया मी डगमगत नाय पण माझ्या धन्यासार माझ्या बी अंगात बळ दे !"
मंदिराकडे दृष्टी करुन केळीच्या पानावर ठेवलेला दही-भाताचा नैवेद्य दाखवत तिने डोळे मिटले. तोच तिचा थोरला भाऊ सोबत बैलजोडी आणि  नांगर घेऊन आपल्या  बहिणीच्या  मदतीसाठी पोहोचला होता.
"रखुताय  सुरवात करायची का मंग ? "
हाकेसरशी रखमा मागे वळली..." थोरल्या कधी आला  र्र ? म्हंजी कालचा निरोप मिळला व्हय ! आक्षी देवासारा धावलास म्हणायचा. "

"
निरोप मिळाला आन बेगिन धावत आलो बग. पावसाचा जोर बी वाडलाय. बाविच्या वाडीत पानी भरलय, आन मानखोर्यात तर लोक घरातून भाईर पडनात , आग समद्या नद्या-नाल भरुन व्हावत्यात."
"
काय बोलतु थोरल्या यवढा पाऊस भरला म्हनायचा ? "
"
व्हय मी नांगरतु, तोवर तु ढेकळ सारकी कर. कामाला लागु... जादा वेळ दवडुन जमायच न्हाय."  म्हणत थोरला कामाला लागला होता.

‘ सकाळच्या पहिल्या प्रहराला आलेली रखमा आणि थोरला, दुपार भरेपर्यंत शेतात राबत होती. पावसाने जोर अजुनच वाढवला. बरेच पाणी-पाणी झाले होते. त्यातच दोन वेळा बाळा पाटील घिरट्या घालून गेला.... त्याला पाहताच क्षणी रखमाच्या काळजाच पाणी झालं. गावातल्या बाया-पोरींवर याची वाईट नजर होती. आज कित्तेक दिवस या छोट्याश्या जमिनीच्या तुकड्यासाठी देखिल तो रखमाच्या मागे हात धुवून लागला होता. पण रखमा त्याला दाद देत नव्हती.’

 "
का ते म्हाइत न्हाय, पन थोरल्या, आजचा दिवस लय  वंगाळवाना वाटतोय... नुसत कसनुस झालय र्र ! "
ताठ उभी राहुन चौफेर नजर टाकत ती उगाचच बडबडली. पण थोरल्याच तिच्याकडे लक्ष नव्हते. शेतबांधावरच्या आईनाच्या झाडावर चढून त्याने  टेहळणी करायला सुरुवात केली होती. शेवटी वासुन तो झाडवरुन सरसर उतरला...आणि  डोक धरुन मटकन खाली बसला.
"रखु आग आभाळ फाटल बगं ! मागची नदी भरली , नदीवरना पानी व्हावतयवरला पुल बी दिसनासा झालाय. आर्र माज्या देवा ! काय केलस काय र्र हे ? "

थोरल्याची अशी दिनवाणी अवस्था पाहुन रखमाला परिस्थितीचा अंदाज आलाथोरल्याला आता लवकरच निघायला पाहिजे . नाहीतर  त्याच्या गावाला जाणारे सारेच रस्ते बंद होतील, हे ओळखून तिने  थोरल्याला उठवले.
"उठ हिम्मत हारु नगस.  ही नदी भरली पन आपल्या धरनाची नदी मोठी हाय, ती भरायच्या आत गाव गाठ... हितन डावीकडन जा... फोफळीच्या दोन बागा उलाटल्या की आट- धा पावलावर धरणाचा पूल लागतु बग."

"
आग पन हित तू यकटी कशी लावनी करायचीस, अजुन तास- दोन तासाच काम हाय न्हव ? " थोरला शेतावर एकवार नजर टाकत म्हणाला.

"
बेगीन पल आता... डोक्यावर पाऊस बग किती भरलाय. पानी अजुन भरल मग आडकुन बसशील.... तुझी पोर वाट बगत आसतील न्हवहे समद म्या बगती... तू आजाबात कालजी करु नगुस. नीग आता."
रखमाचा थोरला भाऊ तिचा निरोप घेऊन निघाला, आपले बैल-नांगर असे साहीत्य गुंडाळत, डावीकडून धरणाच्या पुलाच्या रस्त्याने झपझप पावले टाकत निघून गेला होतापोटाची  खळगी भरण्यासाठी गेले तास दिड-तास रखमा एकटीच लावणी करत होती. अर्धे-निम्मे शेत देखील अजून लावून झाले नव्हते. एवढ्यात आजुबाजुच्या शेतातील मजुर-माणसाची पळापळ सुरु झाली.
"पूर आला... पूरघरला पला गड्यांनो ! मानस व्हावत्यात ....गाय-बकरी बी व्हावुन गेली. पला र्र पला. घराकड पला! "

हातातील आवे खाली टाकुन गडी-मानसे आणि बाया-बापड्या दिसेल त्या मार्गाने घराकडे पळत सुटले होतेगावामध्ये पाणी भरलं असणार हे एव्हाना रखमाच्या लक्षात यायला पाहीजे होतपण हे शेत अगदी डोंगरालगल असल्याने इथे जास्त पाणी साचुन राहू  शकत न्हवते. ' डोंगरा लगलच्या शेतीसाठी मुसलधार आकाड्याचा पाऊस  पायजे नायतर यक आवा बी रुतायचा नाय ह्या जमीनीत...' ही तिच्या नवर्याने सांगीतलेली गोष्ट लक्षात ठेवुन ती पावसाच्या जोरावरती शेत लावतच राहीलीगावाकडची खबर तिला लागली नाही. आता फार उशीर झाला होता.
"मारुतीराया माझी चिमुकली दोन लेकर घरात एकलीच हायत ! त्याची राकन कर देवा !"
मनोमन मारुतीचा धावा करत रखमाने घराकडे पळ काढला. जिवाच्या आकांताने ती पळत सुटली.

१०-१२ मिनिटाचा रस्ता संपतो संपतो तोच घात झाला होता. रस्त्याच्या बाजुला डोलणार्या पिंपळाच्या झाडामागे आडुन बसलेला बाळा पाटील अवचीत येवुन रखमाच्या पुढ्यात टपकला होतात्याने अशी वाट अडवलेली पाहुन रखमा घाबरली...  तिने आजूबाजूला नजर फिरवली तर कोणी चिटपाखरूही दिसेनासगळे लोक शेतातून केव्हाचेच पांगले होते
"काय रखुबाई ! फार वाट बगाय लावता ... घरातून भायर बी पडत न्हाय. शेवटी मीच शेतात आलो. "  पाटील तिच्या थेट समोर उभा रहात म्हणाला.

"
पाटील, काय काम हाय ? लवकर बोला, माझी पोर वाट बघत्यात... घराकड यकटीच हायत."  पाटलाची आपल्यावर असलेली वेडीवाकडी नजर पाहुन रखमाच्या अंगाची आग झाली होती. तरीही तिने शांतपणे विचारले.

"
यका शेताच्या तुकड्यावर यवढी ऊडते व्हय, त्याच्या दुप्पट पैसा देतो बग. गप-गुमान ही जमीन मला मला दे."  पाटीलाने डायरेक्ट विषयला हात घातला होता.

"
पाटील माझ्या हाक्काचा तेवढाच तुकडा हाय. तो देवुन कस जमल? पोरं मोठी झाली की तेवढीच एक शिदोरी हाय तैनला. "  रखमा ताट मानेने उत्तरली.

"
ईचार कर रखमा... तुझी पोरं यकटीच घरात असतात, आणि तू बी हित यकटीच हायस.... कायबी होवू शकत हा."  म्हणत पाटील खीssखीss करून बेशरमीपणाने हसला, आणि तिच्या अजुनच जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला.

 
त्याचे ते हिडीस शब्द ऐकुन रखमाच्या हाता-पायाची आग आग झाली.
"पाटला गप-गुमान वाट सोड, माझी पोरं वाट बघत्यात. उगा वाकड्यात शिरू नग.  "

आपला ' पाटला ' असा एकेरी उल्लेख केलेला पाहुन पाटील सापासारखा फणकारला...
"मला उलट बोलते व्हय. दावतोच तुला."  म्हणत त्याने झटक्यात एका हाताने तिच्या केसाचा बुचडा पकडला. बेसावधपणे ओले झालेले केस जोरात ओढल्याने रखमाच्या डोक्यातुन एक सणसणीत कळ उसळली. बिचारी कळवळली ...तिने हात-पाय मारुन पाहीले, पण काही केल्या तिला त्याचा हात सोडवता येईनाअगदी हताश होऊन तिच्या डोळ्यात पाणी तरळलेती आता काही करु शकत नाही, हे पाहुन बाळा पाटलाला अजुनच चेव एढलात्याने चक्क तिच्या पदराला हात लावला होताकेसावरची त्याची पकड सैल झाली, हे पाहुन संधीचा फायदा घेत रखमाने  कमरेला लावलेला विळा सरकन वरती ऊपसून काढुन उजव्या हातात पकडला होताक्षणाचाच अवकाश... एक गगनभेदी किंकाळी आणि पिचकारी सारखी उडणारी रक्ताची धार एकाच वेळी बाहेर पडली.

"
पाटला ! खर बोललास .... काय बी होवु शकत." 
रखमा मोठ्याने ओरडली. आणि त्या सरशी  तिने त्याला रक्तबंबाळ  अवस्थेत किसनी माळीनीच्या बाजुलाच असणार्या शेतात ढकलुन दिले. तिच्या नवऱ्याच्या एकुलत्या एक शस्त्राने पाटलाच्या हाताचा अचुक नेम घेतला होताहाताच्या तुटलेल्या नसीने पाटलाला उभ्या-उभ्या चिखलात आडवे केले.  सदा भाऊने सकाळीच शेत लावणीसाठी तयार करून ठेवलेल्या कमरेपर्यंतच्या रबरबीत चिखलात पाटील सपशेल आडवा पडलाबाळा पाटील कायमचाच चिखलात रुतला, पुन्हा केव्हा ही वरती रुजुन  येण्यासाठी. उभ्या शेतातील लाल चिखलावर एक वेगळीच लाल करा अलिप्तपणे पसरली होती. अशा पापी मानसाचे रक्त सामावून घ्यायला ती जमीन ही आज तयार नव्हतीपाठमोरी रखमा उजव्या हातात तोच रक्ताळलेला विळा घेऊन, तशीच भिजलेल्या अवस्थेत बेभान होऊन पुन्हा घराकडे धावत सुटली
 ------------------------------------------------------------------------------

काही ग्रामीण शब्द -
आकाडा -आषाढ .
मोप - खुप.
ईरल - बांबूचे वेत,पालापाचोळा तसेच थोड्या प्रमानात प्लॅस्टीक वापरुन तयार केलेले ,पावसापासुन सौरक्षण करण्यासाठी शेतात वापरले जाणारे साधन.
यकली - एकटी.
वंगाळवाना - विचित्र असा.
आभाळ फाटणे - मुसळधार पाऊस येणे.
व्हावत्यात - वाहुन जातात.
आवे- लावनीस तयार झालेल्या हिरव्या भात शेताच्या छोट्या-छोट्या काड्या.
हिडीस - घाणेरडे / वाईट.
केसाचा बुचडा - केसाचा अंबाडा.
सपशेलसंपूर्ण / पूर्णपणे.



वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...