बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

राहिल्या त्या काही आठवणी (कोकण ) - २

(मागील भागात आपण वाचले की, मजल-दरमजल करत आपण घरापर्यंत पोहोचलोय. गावच्या वेशीपासुन ते घराच्या दारापर्यंतचा प्रवास  आपण वाचला. आणि त्याला भरभरुन प्रतिसादही दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. या भागामध्ये आपण या सगळ्या आठवणींना असाच उजाळा देत सैर करुया कोकणातील माझ्या घराची. हाच प्रवास पुढे नेण्यापुर्वी मी या भागात  माझ्या कोकणातील टुमदार जुन्या घराच्या काही निवडक आठवणी मांडत आहे. खरतर कोकणातील  घराची वर्णन खुप ठिकाणी वाचायला मिळतात. पण तरीही माझ्या लेखमालीकेचा एक भाग म्हणून, मी इथे थोडक्यात घराचे वर्णन करत आहे. कारण पुढील भागातील पुष्कळशा आठवणी या घराच्याच आवती-भोवती फिरणार्‍या आहेत. )

कोकणातील घर म्हणजे एक टुमदार आयताकृती कलाकुसरीचा देखावाच. संपूर्ण घराच्या भिंती या मातीच्या किवा विटांच्या मापानी बनवलेल्या. त्यांना मस्त शेणामातीने सारवून गुळगुळीत केलेले असते. वरती कौलारु छत . वलई करुन पायाखालची जमीन देखील मस्त शेणामातीने सारवली जाते. सारवणे ही सुद्धा एक कलाच आहे . आता लादी-प्लास्टरच्या युगात सारवणे म्हणजे काय ? हे देखील खुप जाणना माहीत नसावे. मस्त रबरबीत शेणामध्ये थोडे पाणी घालुन दहीकाला प्रमाणे काला केला जातो. यातील थोडे-थोडे मिश्रण हातामध्ये घेऊन हातानेच जमीनीवर फिरवले जाते. खोलीच्या एका कोपर्यापासुन दुसर्या कोपऱ्यापर्यंत हेच शेणाचे मिश्रण हाताने फिरवत खाली-खाली आणले जाते. जमीनीमध्ये एखादा खाच-खड्डा पडला असेल, एखादी चिर पडली असेल, तर यावर मिश्रणाचा हात मायेने गोंजारला जातो,  तिची मरम्मत केली जाते . मग जमीन अगदी नव्यासारखी गुळगुळीत होते. आणि बैठक मारुन खाली बसणार्यालाही याचा आनंद मिळतो.
कधी झरझरत्या हातानी यावर राखुंडीची नक्षी , तर कधी नुसत्याचा थोड्या सागरलाट ओढुन ही जमीन सुशोभीत केली जाई.  उंबर्यावर याच रांगोळीने फुलवेलीची नक्षी काढली जाते . देवासमोर स्वस्तिक काढले जाते . या सगळ्यावर हळद-कुंकू वाहिल्या शिवाय या  सजावटीस पुर्णत्व  प्राप्त होत नाही. दार-खिडकीवर पान-फुलांच्या माळा गुंफल्या की  मग ते घर कोणत्याही सणा-समारंभासाठी सज्ज असे..... अगदी दिमाखात .  तो  शेणामातीचा दरवळ घरामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रसन्नता पसरवत असे.

कोकणात सर्वसाधारण घर आणि आजुबाजुचा परिसर याची रचना सारखीच असते.  सुरुवातीलाच एक बेडा लागतो. त्यानंतर दगड ,चिरे , विटा ,  यांच्या पासुन बनवलेल्या २-४ पायर्या . पायर्या चढुन वरती आल्यावर खळ लागत, तेही मस्त वलई करुन तयार केलेल.  वलई करणे म्हणजे जमीन करणे.  हे देखिल एक कौशल्ल्याचे काम. खळ्यातील, परसातील  आणि अगदी घरातील जमीनीची वलई केली जाते. या मध्ये त्या भागातील जमीन कुदळाने किवा खनतीने खणुन घेतली जाते.  खनलेली मोठीमोठी ढेकळे फोडुन सारखी करुन बारीक माती तयार होते.  यासाठी या ढेकळावर चोपण्याने जोराचा चोप दिला जातो.  ही बारीक झालेली माती काहीही चढउतार न ठेवता सरळ एकसमान अशी पसरवुन यावर पाण्याचा फवारा केला जातो. माती अगदी आतपर्यंत ओली होऊन मऊशार होई पर्यंत पाणी मारले जाते. अगदी यावर पाय ठेवला तर पायही आतमध्ये रुतेल एवढ्या प्रमानात पाणी मारुन या जमीनीवर हलकेच दाब दिला जातो.  ६-७ तासांमध्ये ही जमीन वाळली की मग परत २-३ वेळा यावर चोपन्याने दाब दिला जातो. यावेळी मात्र ही जमीन कुठेही उंचसखल राहणार नाही, याची काळजी घेतली जाते.  समांतर अशी जमीन तयार झाल्यावर यावर शेणामातीचे सारवण करुन दुसर्या दिवशी ही वलई केलेली जमीन वावरास योग्य अशी तयार होते. खळ्यातील वलई केलेल्या जमीनीवर भात वगैरे झोडले जाले,  अश्या वेळी या थोड्याशा ओलसर जमीनीत एखादा भातदाणा रुजुन वरती येई. आपली ईवलीशी पाने फडफडवत ताठ मानेने तो खळ्यामध्ये झोकात उभा ठाके. जणू येणार्या जाणाऱ्यांच्या स्वागतासाठीच त्याला नेमले असावे.
' डोंगर का पाणी' खेळण्यासाठी खळ प्रसिद्ध असे . खळ्याच्या कडेला अर्धगोलाकारपणे लावलेल्या दगडाला डोंगर आणि खळ्यामधील जमीनीला पाणी समजुन खळ्यामध्ये मस्त खेळ रंगायचा . आता कोणी असे खेळ खेळताना पाहील्याच अजीबात आठवत नाही.


दितील रंगीत गारगोटे ,फरश्यांचे वेगवेगळ्या रंगानचे तुकचे ईत्यादी पासुन बनवलेली तुळस घराच्या समोर पुर्वेकडील दिशेस उभी असे.  तिच्या समोर एखादे स्वस्तिक त्यावर थोडे हळदी-कुंकू, समोर एक दोन तगरीची फूले असत.  बाजुला एक तेवते निरांजन ही असे. तुळशीमध्ये एक-दोन अगरबत्ती रोवलेल्या असत. पुजेच्या वेळेस तुळशीला वाहीलेल्या दुर्वा ,  झेंडूची फुले तेथेच रुजुन तुळशी लगतच वृंदावनामध्ये दाटीवाटीने वरती पसरत.  घरासमोर खळ्याच्या दोन्ही बाजुला मस्त जासवंदि वाढत ... कर्दळीची बेटेच्या बेटे फुलून येत... अबोलीचे ताटवे बहरत.... सोनचाफा, निशिगंध , रातराणी ही फुलझाडे मात्र थोडी दुर कुंपणालगत लावलेली असत. त्याच्या वासाला जनावरे येत , म्हणुन अशी झाडे घरापासुन योग्य अंतर राखुनच लावली जात..

ग पुढे लागे, ते घरचे मुख्य प्रवेशद्वार ! घराचे दरवाजे... 'हो दरवाजा नाही.... दोन दरवाजे. ' , कारण तोही एकटा नसे.  एकमेकांच्या हातात-हात आणि गळ्यात-गळे घालुन मधोमध दोन दरवाजे अगदी दत्त म्हणून उभे असत.  कुंडी बाजुला सारली की हे दोन्ही दरवाजे कुरबुर करत एकमेकांन पासुन विलग होत. आजकाल एकटा-दुकटाच दरवाजा पहायला मिळतो....अगदी निराश आणि एकलकोंडा....त्यावर ही छोटस टाळ, जणु त्याची कुरबुर कुलूपबंद करण्यासाठी. पुर्वी मात्र ते दोघे सताड उघडे असत... एकमेकांच्या साथीने.

दारातुन प्रवेश झाला की आपण पडवी मध्ये पोहोचतो.  लाकडी गजाच्या मोठाल्या उभ्या-आडव्या बार्या असणारी पडवी. एका बाजुला दणकट लाकडाचा झुलता झोपाळा आणि  दुसर्या  बाजुला एक जुनाट लाकडाची पण पॉलिश केलेली आरामखुर्ची... बुजुर्गांच्या आठवणीची  निशाणी म्हणुन... त्यावर नायलॉनच्या ताठ धाग्यानी विनलेली झालर असे . उजव्या बाजुला अगदी कोपर्‍या सरशी एक भलामोठा लाकडी पेटारा दिमाखात बसवलेला असे.  घरातील जुन्यापुराण्या अवजड वस्तु , शेतीची हत्यारे-अवजारे अश्या सगळ्या प्रकारच्या अडगळीचा भार अत्यंत प्रेमाने यात सामावलेला असे. या सगळ्या लावाजम्यावरुन तुम्ही मनसुबे बांधू शकता की, या समोरच्या पडवीचा आकार किती मोठा असावा .

पुढे तीन बाजुनी भिंती आणि  समोरची बाजु उघडीच अशी ओटी पडवी ओटी लागे.  छोटीशी हवेशीर रुम म्हणजे ओटी. आमचा देवाराही ओटीवर असायचा. सोनं-नाणं सांभाळून ठेवण्याची जागाही माजघरातच असे. ' कोकणात घरोघरी गणपती येतात. तसेच शिमगोत्सावाच्या वेळी, देवाची पालखी किवा डोलारा ही घरी येतो. अश्या वेळी देवाला बसवण्यासाठी या ओटीची रचना केली, असे माझे अजोबा सांगायचे.'  हल्लीच्या  नविन घरानमध्ये ओटी असल्याचे जास्त पाहावयास मिळत नाही .

पुढे पडवी , त्या मागे ओटी आणि स्वयंपाकघराच्या मधोमध तयार होणार्या कोपर्‍यात माजघर असे. यालाच काही ठिकाणी  मजघर असेही म्हणतात.  ही अगदी ठेवणुकीची रुम.  पुजे पासुन ते  छोट्यामोठ्या  सण-सोहळ्यासाठी माजघर वापरले जाई.  आजीच्या चंची पासुन ते काकुच्या बटव्या पर्यंत चे सगळे सामान  इथे असे.  इथे मुख्यता: स्त्रियांचे राज्य. पुरुष मंडळीचा ओटी-पडवीमध्येच जास्त  वावर . इथे एखादी लाकडी  अलमारी...त्यामध्ये एखादा कृष्णधवल फोटो , बंद पडलेला एखादा जुनाट रेडीओ असे. याची गम्मत अशी की,  आजोबा  '' हात्तीच्या मारी बन्द कसा पडला ररर हा ? " असे म्हणत त्यावर दोन फटके मारत , हे धपाटे पडल्यावरती तो आपोआप चालु होत असे .
जेवनाचा-खाण्याचा कार्यक्रमही माजघरातच होत असे. यावरुन वेगवेगळ्या प्रसंगावरुन वेगवेगळी अशी माजघरातील गाणीही प्रसिद्ध होती.

 जेवनावरुन रचलेल गाण.

* सांगा  प्रभुला  सैयपाक झाला । विठुजी जेवायला चला ॥०॥
रांगोया काढुनया लावील्या समया । लावया उदबया सुगनधीया ।
चांदीचा हा मांडूनी पाट । कनकाचशोभतबघा ताट । 
पेला घेतिला पांचुचा कांठ ।
सर्व थाट घडवुनीं  सुन्दर केला ।  विठुजी जेवायला चला ॥१॥
शोभेपान केळी ची लिमबलवणी  । डाळीची नारळाची वाटल चटणी ।
कोशबीर पेरु केळीची फणी । रायतीं रुचिर झालंलीसाजणी । 
भरत वांडा दोडयाचे भोपळ्याचे।
आवडीने देवा केलेमी  तुजला  । वठुजी जेवायला चला ॥२॥


कोणाला मुलगा बघायला आला, म्हणजे स्थळ आल तर त्यावरुन रचलेल गाण.
* आलं गंगाला मागनं पावना घ्यावा पारकून
बसायला टाका  पिनढपाट . पसायाचे जातगोत 
याची जात धनगराची आमची गंगा बामनाची ॥०॥
याची आमची सोयरक हाई आमची गंगा याची हाई
जागा पाहूंजागाईत मळा पाहूं बागाईत
नवरां पाहूं रुपशाई तथं देऊं गंगाबाई ॥१॥


भाऊ बिजेला ओवाळनीच्या वेळेस चलेल गाण.
* भाऊबीज माझे सदनीं मनीं हर्ष झाला
दिन बंधु करुणा सिन्धू ओवाळीन त्याला ॥०॥
नवलपरचीं नव पक्वाने करीन स्वये आजी
श्रवणाचे शंकरपाळे,  किर्तन करंजी
हरी स्मरण केल कैसी जिलेबी ताजी
चरण सेवनाचे लाडू वळूनी वाढूंया याला ॥१॥

नवा कोरा कपडा-लत्ता, सनासुदीला घालायचे दाग-दागीनेही याच माजघरात ठेवलेले असत त्यावरुन रचलेल गाण. 

* धन संपतीला काय उणं , सख्या वो आपल्या वो घरी जाऊनी या
पिवळी  शेलारी यावी घेऊनी अवघ्या नगीं लव भरजरची
घडी  रुमालांत घालनी  आणावी चौकशी करोनी
एवढं वरचेवरी ऐकुनी पिवळी शलारी यावी घेऊनी  ॥०॥
श्रावण शुद्ध आला महना नागर पंचीम आली साजणा
मन पुजा  करीन गौरीची आवड मला पिवळ्या  शेलारीची
राधा नेसनी रुपसुनदर लोळे पतीच्या ग चरणावर  ॥१॥



कडे स्वयंपाकघराची तर्‍हा मात्र न्यारीच... अन्नपूर्णेचा भरभरुन मिळालेला वरदहस्त आणि घर मालकीनीचे ओतपोत भरलेले प्रेम याने स्वयंपाकघर  नेहमीच समृद्ध असे .  आग्नेयेला तांब्या-पितळेची भांडी, एखादे  मातीचे माठ , गरम पाण्याचा बंब असे सर्व ठेवलेले असे .  तर पुर्वेला चुल्हा मांडलेला असे . त्या शेजारी वैल ही असे .  चुल आणि वैल याच्या वरती मोकळी जागा राहते तिथे लोखंडाचा चिमटा , चावी माचिसचा बॉक्स , घासलेटची चिमणी  हे साहित्य नेहमीच पहायला मिळे . चुलीच्या बाजुला फाटयाचा छोटासा ढिगही सदैव रचुन ठेवला जाई .  एखादे काळे पडलेले तपेले ही पाणी भरुन बाराही महिने चुलीवरतीच ठेवलेले पहायला मिळे. दिवसभर केव्हाही पाणी लागले तर यातील पाणी काढुन, यामध्ये पुन्हा भर घातली जाई. भांडी ठेवण्यासाठी लाकडी मांडणी , स्वयंपाकास लागणारे साहीत्य ठेवण्यासाठी  लाकडी आयताकृती  पेटी  अशी या खोलीमध्ये दाटीवाटी एकंदरीत असे.  पुर्वी मिक्सर नसायचे तेव्हा पाटा-वरवंटा याचे राज्य ही याच खोलीत .... पाट्यावरील वाटपाच्या जेवनास कशाचीही तोड नाही. लसुन खोबर्याची चटणी , दाण्याचे कुट , शेंगदाण्याची चटणी , धाण्याची भरड ईत्यादीसाठी व्हायन, उखळ-मुसळ तसेच खलबत्ता वापरला जाई  तोही याच खोलीत असे.
(अधीक माहीतीसाठी पहा - https://siddhic.blogspot.com/2019/05/blog-post_2.html )  या सगळ्या वस्तु स्वयंपाकघरात पहावयास मिळत . याच स्वयंपाकाच्या खोलीत साठवणुकीच्या धाण्याच्या कणग्या, हारा, टोपल्या वरती कढीलिंबाचा पाला लावून किडमुंगी लागु नये म्हणुन बंद करुन ठेवलेल्या असत.

न्हाणीघर आणि शौचालय मात्र  शेवटी एका बाजूला कोपर्‍यात असते .
पण लहान मुलाना न्हाऊ घालण्यासाठी बाहेर परसात पोफळी किवा वेळूचे बांबू आणि नारळाच्या झावळ्या या पासून छोटेखानी न्हाणीघर बनवलेले पहावयाला मिळे. पातेलीमध्ये गरम-गरम पाणी घेऊन तांब्याने लहानग्यांना कडेवर घेऊन प्रेमाने न्हाऊ घातले जाई . याची एक गम्मत अशी की , माझ्या लहानपणी आजी आम्हा सक्ख्या-चुलत भावंडांना एकत्र न्हाऊ घालत असे. तेव्हा आम्ही एकत्र रांगेत अंघोळीला बसायचो, गरम पाण्यात थोडा कढीलिंबाचा पाला टाकुन एक-एक तांब्या प्रत्येकाच्या डोक्यावर ओतुन, लालेलाल लाईफबॉय साबणाची प्रसन्न अंघोळ असे . अगदी दिवाळीच्या पहिल्या अंघोळीप्रमाने वर भिजलेल्या चणाडाळ आणि सहानेवर उगाळलेल्या चंदनाचे एकत्रीत असे तयार केलेके मिश्रण अंगाला लावले जाई .... त्याचा मस्त सुहास पसरायचा.  " आजी तु ताईला थोडे अधीक चंदन लावले,  मला कमी , मला छान वास येत नाही  " असे म्हणत आम्ही थोडे जास्त डाळ-चंदनाचे मिश्रण अंगाला लावुन घेण्यासाठी भांडायचो.... रुसूनही बसायचो.  Mysore Sandal Gold Soap चा टॉप ब्रॅन्ड वापरला तरीही त्या आजीच्या हातच्या अभ्यंगस्नानाची सर यायची नाही.


काही ग्रामीण शब्द-
बेडा - अंगणाचे प्रवेशद्वार
माप - मातीच्या घरगुती विटा
पडवी- ओसरी
राखुंडी - राख
जनावर - साप
चोपने - धुणी बडवायच्याला धोका
फाटी - चुलीत जाळण्यासाठी घालायची लाकडं 
हारा-बांबूची मोठी टोपली
वलई  करणे - उठण्या-बसण्या योग्य नविन जमीन  तयार  करणे
कुदळा/खनती - जमीन खनतन्याचे साधन
बार्या - खिडक्या
डोलारा - मोठ्या आकाराची पालखी 
अलमारी - मोठे लकडी कपाट
वैल - चुलीच्या बाजूला असणारा गोलाकार वईल चार खुर असलेला त्यावर स्वयंपाकासाठी पातेले वगैरे ठेवले जाते.
घासलेट - रॉकेल

(डकवलेले फोटो फक्त रेफरन्ससाठी घेतलेले आहेत.) (क्रमश)

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

गोंदण

" कमुला पाहील का हो तुम्ही ? माझी कमु हरवली आहे, कमु.... तुम्ही पाहील का तीला ?" 
कोणीतरी माझा हात धरुन मला विचारत होते.
" च्या आयला मी तर स्वतःच हरवलो आहे. केव्हा पासून स्वत:चा पत्ता शोधतोय...पण सापडत नाही आहे. दुसर्यांना काय खाक शोधणार"  - मी स्वत:शीच.  तरीही न रहावून मी मागे पाहीले, एक आजोबा माझा हात धरुन विचारत होते.
" माझ्या कमुला शोधायच आहे हो,  आम्ही प्रभादेवीला जायला निघालो होतो.  हाच प्लॅटफॉर्म ....खुप पाऊस आला आणि सगळीकडे गडबड  झाली. गर्दीत चुकुन तीचा हात सुटला हो, आणि... आणि सगळीकडे गडबड झाली. तीला प्रवासाच काही समजत नाही.  आता कुठे सापडत नाही ती."  मला त्यांची दया आली. " आजोबा थांबा मी काऊंटर वरती चौकशी करतो. कॅमेरा वेगैरे असेल मी बघतो. " म्हणत मी काऊंटरकडे निघालो.

ते तिथुन ओरडुन म्हणाले " कमळाबाई विठ्ठल परब' सापडल्या का विचारा हं ! असेलच ती इथे कुठेतरी ! असेलच ती, माझी वाट बघत ! "


काऊंटर वरती चौकशी दरम्यान काही वेगळेच समजले.  ' त्या आजोबांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणे, रोज इथे येऊन येणार्‍या-जाणार्‍या जवळ अशीच चौकशी करत असतात . मग त्यांची मुल येऊन त्यांना घरी घेऊन जातात.'


मी चौकशी करुन मागे वळलो, खरच त्या आजोबांना हाताला धरुन कोणीतरी घेऊन जाताना दिसले.  मी खीन्न मनाने ट्रेन पकडली. कधी नाही ते , कोणाला तरी मदत करायला निघलो होतो. आणि काहीतरी वेगळेच समोर यावे.

" मी सुद्धा असाच हरवलो आहे, कोणीतरी शोधून दया रे "
माझ्या मनात विचार येऊन गेला.

*****


" जयु तु तयार आहेस का?  निघायचं ?"

" आई मला खरंच काही इंटरेस्ट नाही गं.  तुम्ही दोघे जातात का ?  तस ही तुम्ही आधीच पसंती दिली आहे. "
"  जयु please मला आता काही नाटकं नको. तुम्ही पसंती दिली आहे ! म्हणजे काय?  अरे,  आम्ही फक्त मुलगी छान आहे एवढेच सांगीतल.
४ वर्षे झाली आम्ही मुली बघतोय, पसंत करतो, पण तु प्रत्येक वेळी कारण देऊन विषय टाळतोस. तुला लग्न करायचंय नाही का, तसं सांग.  म्हणजे मी शोधा-शोध करणे धांबवते. "
" आई...... तु आता लेक्चर चालू करू नको. रोज रोज तेच-ते ऐकून कंटाळा आला आहे."
" अरे मी एकटी थकली आहे रे.  तुझे बाबा तर काही लक्ष देत नाहीत. अजुन किती दिवस मी सांभाळणार आहे सगळं ? तुला सांभाळणार कोणी तरी पाहिजे ना ?  तुझ लग्न झाल की, घोडं गंगेत न्हाल समजाचं."

'आईच्या तोंडाचा पट्टा चालू होता. आणि मी ही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.... नेहमी प्रमाणे. आता तीला कसं समजावणार की, एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेली की तीची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. स्वरा मला सोडून गेली.... किती आना-भाका घेतल्या होत्या दोघांनी. मी वेळोवेळी सगळी promise जपायचो, पण तीला तो गडगंज पैसेवाला मुलगा मिळाला, आणि ती खुशाल लग्न करून निघून गेली.  College पासून सुरू असलेल आमचं नातं...तीने क्षणात झिडकारल. आता विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. नात्यांवर आणि माणसांवरही.'

या माझ्याच विचारात मी गाडी स्टार्ट केली.  आई केव्हाची बाजूला येऊन बसली होती.

*****


निती माझ्या समोर बसली होती.  दिसायला ही बर्‍या पैकी. ती किती रूचकर स्वयंपाक बनवते.  सगळ्यांना संभाळून घेते.  वगैरे वगैरे ऐकुन मी जाम पकलो होतो.  इकडच्या तिकडच्या गप्पा, रहाण्या, खाण्या-पिण्याच्या गोष्टी चालू  होत्या.  माझं मन मात्र कुठेही लागेना.  नेहमी प्रमाणे हे न जुळलेलं लग्नं सुद्धा मोडण्यासाठी मला फक्त एक क्ल्यू पाहीले होता.  पण मनासारखे पक्कड काही मिळेना.  प्रोब्लेम असा होता की, याआधी पाहिलेल्या मुली मुंबई किंवा आसपासच्या परिसरातील होत्या.  तेव्हा बघण्याचे कार्यक्रम झाले तरीही मी, नंतर त्यांच्या ऑफिस मधून किंवा सोशल मीडिया वरुन काही ना काही माहिती शोधून काढायचो.  काही अगदीच शुल्लक कारणावरून देखील, मला ही मुलगी पसंत नाही.  असं सरळ सांगून टाकायचो.  काही कारणं तर मजेशीर असायची.


' जर स्थळ आमच्या नातेवाईक मंडळींच्या नात्यातील असेल. तर मग नात्यातील मुलगी नको नात्यामध्ये भांडणं होतात हे ठरलेले कारण.... केव्हा केव्हा तर मुलगी सारखी व्हाट्सअप वर असते म्हणून नको.... तिच्या ऑफिस मध्ये माहिती काढली तर समजल की ती भांडखोर आहे म्हणून नको..... 'स्वयंपाक अजून एवढा जमत नाही,' असे जर मुलीच्या घरातूनच समजले तर मग काय विचारता, तीला लांबूनच दंडवत असे.  गंमत म्हणजे, खूप सा-या मुली तर मलाच रिजेक्ट करायच्या. कारण माझा चेहरा बघून त्यांना एकंदरीत अंदाज यायचा, की हा किती इंटरेस्ट ने इथे आला आहे ते.  मग तर माझ्यासाठी सोन्याहून पिवळे.'


पण इथे गोष्ट वेगळीच होती.  निती नाशिक ची होती. मग परत मुंबईहून एवढ्या लांब येऊन तीची माहिती काढणे,  म्हणजे अवघड काम होते.  दुसर म्हणजे ती कोणत्याही नातेवाईकांची नातलग लागत नव्हती,  त्यामुळे ती आशा पण मावळली.  बाई सोशल मीडिया वर सुद्धा अमावस्या पौर्णिमेला दिसे, मग तो ही चान्स गेला.  आईच्या मते तर  निती म्हणजे, सद्गुण आणि सुंदरतेचा पुतळा जणू. मला शंका तोंडावर आली रे आली... की त्यावर आई कडुन शंका निरसन असायचेच.


खाणपाण झाल्यावर मला अस्वस्थ वाटू लागल... अगदी शेवटच्या क्षणाला आम्ही घरी जायला निघालो.  आणि मला एक परफेक्ट क्ल्यू सापडला. त्या बरोबरच संधी देखिल चालून आली. ' निघता निघता आम्हाला दोघांनाच बसून बोलण्यासाठी म्हणून थोडी स्पेस म्हणून सगळे बाहेर गेले. आणि इकडचे तिकडचे काही न बोलता मी डायरेक्ट विषयाला हात घातला...


" तुमच्या प्रोफाईल मध्ये सांगितले की इथे तुम्ही एकट्याच  राहता,  आणि बाकी तुमचे सगळे नातेवाईक बाहेर गावी असतात."

बहुतेक तीला हा प्रश्न अपेक्षित नसावा.  ती थोडी कावरीबावरी झाली. हे माझ्या लक्षात आले.  तरीही ती म्हणाली.
" हो बरोबर ! "
" पण मग तुम्ही सारख आजी-आजी करताय. आणि त्या ज्या आतमध्ये आहेत त्या कोण ?"  मी लगेचच पुन्हा प्रश्न केला.
'माझ्या प्रश्नासरशी ती दोन मिनिट शांत बसली.'
'इकडे मला जिंकल्याचा फिलींग येत होत.'
चला हिने तीच्या प्रोफाईल मध्ये दिलेली माहिती खोटी आहे तर.  आईला सांगतो,  एवढ्या छोट्याशा गोष्टी साठी ही आत्ताच खोटं बोलते. मग नंतर किती खोटं बोलेल.  आणि लग्नानंतर तिच्या आजीला सुद्धा सोबत घेऊन येईल.  कारण तसही तीला सांभाळणार इथे कोणीही नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे कारण कितीही शुल्लक असल तरीही मला क्ल्यू सापडला होता, आणि त्याचा वापर इथे कसा करायचा हे मला खुप चान्गल माहीत होत. राईचा पर्वत बनवण्यासाठी मला तेवढ कारण पुरेसं होतं.

मी परत खुळचटपणा सारखा प्रश्न केला.

" तुम्ही उत्तर दिले नाही?"

 आतमध्ये डोकावून पाहिले आणि ती म्हणाली.


" २००५ साली माझ्या ऑफिस च्या कामानिमित्त मी मुंबईला होते.  त्याच कालावधी मध्ये तिथे महापुर आला होता. तुम्हाला माहीत असेलच. या आजी मला CST ला जखमी अवस्थेत सापडल्या.  मी त्यांना डाक्टर कडे घेऊन गेले,  तर असं समजलं की डोक्याला मार लागल्याने  त्यांची स्मरणशक्ती गेली आहे.  मी स्वतः एक दोन पेपर अँड दिल्या,  CST ला एक आजी सापड्ल्या आहेत म्हणुन. त्या सोबत फोटो ही होता. पण काही चौकशी आली नाही.  त्यांना काहीच आठवत नव्हते.  एकतर यांना कोणीही नातेवाईक नसावे किंवा त्या पुरामध्ये त्यांचे काही बरेवाईट झाले असावे.  मुख्य म्हणजे हल्ली अशा  म्हातार्‍या आई-बाबंची जबाबदारी घेण्यासाठी मुलंही तयार नसतात.  अजुनही बर्याच शक्यता असू शकतात...


शेवटी माझ्याकडे पर्याय राहिला नाही, आणि माझे मुंबई मधील कामही संपले होते.   म्हणून मी त्यांना माझ्या सोबत इकडे घेऊन आले. "


ती बोलत होती आणि मी एकटक तीच्याकडे बघत होतो.  काय बोलावं मला सुचेना. "साल्या इथे तर सपशेल हरलास तु...."  मी एवढेच, पण मनातल्या मनात म्हणालो.

ती तर बोलता बोलता फार सिरीयस झाली होती. मग उगाचच काहीतरी विचारायचे म्हणून परत प्रश्न केला.
" तुम्ही पोलिसांना का कळवले नाही ? त्यांची नक्कीच मदत झाली असती."
" त्यांना काहीच आठवत नाही हो !  अँड तर मी ही दिली होती. पोलीस काय करणार ?  फार तर त्यांनी या आज्जीना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवले असते. आणि हे पाप माझ्याने पहावणारे नाही."
नितीच्या या वाक्याने मी खजील झालो. आणि निरुत्तर ही.

*****


आईच्या मांडीवर डोक ठेवून मी झोपलो होतो.  लग्नाला एका दमात होकार दिला. आईला केवढा आनंद झाला. आणि आश्चर्य ही. ती मला राहून राहून सारखे एकच प्रश्न विचारत होती.  " जयु... मुलगी नक्की पसंत आहे ना ? की मी सारखी सारखी मागे लागत असते म्हणून होकार दिला आहेस."


मी हो म्हंटले.

" आई मला तीला भेटायचं आहे ! "
" बर मग कुठे भेटायच म्हणतोस. तु नाशिक ला जाणार आहेस, का नितीला इकडे बोलवून घेऊ?"
" तीला बोलाव CST ला.  सोबत आजींना घेऊन यायला सांग."
" CST ला का रे ? डायरेक्ट घरी येऊ दे ना !"
" आई तु पण ना.... CST ला मी जाईन आणि त्यांना घरी घेऊन येईन."

आईचा आंनद गगनात मावेनासा झाला.  तीने लगोलग कॉल करून निती ला बोलावणं पाठवलं सुद्धा.

' खरच.... निती पेक्षा चांगली मुलगी मला मिळाली नसती.  आपण रक्ताच्या नात्याला तेवढे महत्व देत नाही.  कुठच्या कोण, त्या आजींचा संभाळ करणारी निती म्हणजे खरच आई म्हणते तशी, नात्याना महत्च देणारी आणि मानुसकी जपनारी अशीच होती.

काही वेळा गोष्टी आपल्या नजरेसमोर असुनही आपण दुर्लक्ष करतो. आपण आपल्या भावनांना एवढे कवटाळून बसतो की, आपल्या नजरेसमोरील कित्येक चांगल्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. आपण जे शोधत आहोत, ते हेच आहे हे समजायला हवे.'


माझ्या बाबतीतही असेच झाले.

त्या दिवशी नितीच्या घरातुन निघता- निघता मी त्या आजींच्या पाया पडलो.  डोक्यावर त्यांचा आशीर्वादाचा हात होता.  सहजच उठता उठता त्यांच्या हाताकडे लक्ष गेले, त्यांच्या उजव्या हातावर एक गोंदण कोरलेले होते.  आणि त्यावर नाव होते. 'कमळाबाई विठ्ठल परब'....जुनी गोंधणाची संस्कृत इथे कामाला आली आणि मला कमळाबाई परब सापडल्या.

मागे स्टेशन वरती भेटलेले आजोबा आठवले.  "माझी कमु हरवली आहे हो! "...म्हणत ते एवढी वर्षे त्यांच्या कमुचा शोध घेत आहेत.  त्या ७० पार आजोबांच्या आशेला एक कारण होते. ते म्हणजे त्या आजी.  म्हणूनच तर त्या दिवशी स्टेशन वरती त्यांची आणि माझी भेट झाली असावी.


आता एक गोंदण मी माझ्या मनावर कायमचे कोरुन ठेवले.  ते म्हणजे जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि जे नशिबात नाही,  त्याचा विचार करून शोक करण्यात काहीही अर्थ नाही.



समाप्त.

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

राहिल्या त्या काही आठवणी (कोकण) - १

कोकण म्हणजे ओल्या मतीचा गंध,
कोकण म्हणजे हळुवार मनाचा बंध,
कोकण म्हणजे कोवळी पहाट स्वच्छंद,
माझ्या मनातील कोकण म्हणजे... एक लहर बेधुंद ॥
हिरव्यागार रान पसार्‍याच्या मधुन कुठुन तरी सुर्य नारायणाचा चोरटा कटाक्ष पडत होता. त्याच्या उदयाची चाहूल होती ती. त्या कटाक्षाने वातावरणात पसरलेले धुके किंचीतसे दूर पळू लागले होते. सळसळत्या गवतपात्यावरील दवबिंदू चमचम करत होते.
कुणीतरी विस्तवावर फुंकनीने फुऊsssss, फुऊsss,,,, फुऊss,,,, अशी फुंकर घाली त्याचा आवाज, आणि त्यातच भर म्हणुन, मधुन येणारा जळक्या कोर्‍या चहाचा गोडूस वास.... चालत असताना बाजूला रस्त्यालगत असणार्या, एका घरासमोरील खळ्यात माझी नजर गेली. मस्त शेणाच्या सारवणावर, राखेच्या करड्या भुकटीने झरझरती रांगोळी आकारली होती. कोण्या साठीपार आजीचे थरथरते हात या मागे असावे. (लाकुड जळाल्या नतर जी सफेद, करडी भुकटी मागे शील्लक राहते, त्याचा पुर्वी रांगोळी म्हणुन वापर करत असत.) पाय वाटेचा रस्ता अगदीच कच्चा होता. गावच्या लोकांच्या जीवनात जे खाचखळगे असतात आणि एवढ्या खाच-खळग्यातही ते आनंदी रहातात याच जणू प्रतिक म्हणजे हे रस्ते. मातीची नुसतीच भरणी, कधी ओभड-धोबड दगडांची चादर, तर कधी अर्ध्यातच पसरवलेले खडी आणि डांबर. या रस्त्यांची कहानीच वेगळी.

'गाव म्हणजे गावच । शब्दात मांडणे कठीण. दुसरे, तीसरे काही शब्द याला लागू होत नाहीत.'
सकाळचा प्रवास, छे... सकाळ कुठली पहाट, पहाटेचा पाच साडेपाचचा प्रहर. नुकताच बसचा प्रवास करुन, शेवटी आजुबाजुच्या वातावरणाचा कानोसा घेत, आम्ही आमच्या गावच्या मुख्य रस्त्याला लागलो होतो. दुर शेतीबांधा पलीकडे, झरझर वाहणारी आमची थोरली नदी मंजुळ गाणे ऐकवत होती.
तर दुर डोंगर कपारीतुन म्याओssss,,,, म्याओ sss,,,, म्याओss,,,, असा मोराचा आवाज कानी पडत होता.
खडबडीचा मेन रस्ता संपवून, आम्ही चिखल मातीच्या पाऊलवाटेला लागलो. पाऊलवाट असली तरी गावातील लोकांनी मोठाले दगड वगैरे रचुन ही वाट चालण्यायोग्य केली होती हे एक बरी झाले. मध्येच एखादे बेडकाचे पिटुकले पिल्लू टुनकन उडी मारुन इकडुन तिकडे जाइ. ईथुन चालताना आपला झगा संभाळण्यासाठी मला मात्र कसरत करावी लागत होती. गुडघाभर वाढलेल्या गवताने, लवलव करत माझ्या पायात मस्त फेर धरला होता. आणि त्यावर भरभरुन पसरलेले दवाचे थेंब, माझा पायघोळ झगा कधी भिजवून गेले मला समजले देखिल नाही. बाबांची पॅन्ट् देखिल पायालगत थोडी भिजून गेली होती. केव्हा एकदा घरी पोहोचू असे झाले होते.
आता रस्त्याचा दुतर्फा घरे दिसू लागली, आणि मला हायसे वाटले. येणार्‍या जाणार्‍याच्या स्वागता साठी जणू ही घरे प्रथमदर्शनास सज्ज झाली होती. बाजुच्या वेणू काकुच्या कौलारू घरावर धुराची वलय चढत होती. वाटे पळत - पळत जाऊन एक घोट कोरा चहा मागावा..... थोडीशी चहापावडर, साखरेचा किवा गुळाचा नुसता पाक, मापक प्रमानातच पाणी आणि चहाची हिरवी पात, अद्रक असेलच तर फक्त नावाला.... असा कोकणी मानसाच्या गोड स्वभावाप्रमाने गोड चहा... आहा । पहाटेची सुंदर सुरुवात अजुन वेगळी ती काय असणार ? आणि लाल तांदळाचे दोन मऊ-लुसलुशीत घावणे या चहा बरोबर न मागता मिळत, त्याचा आनंद आगळा-वेगळाच.
पण अशा गोड विचारा मध्ये ही, मी पाय ईकडचा तिकडे करायला तयार नव्हते. कारण मला जास्त ओढ होती ती माझ्या स्वतःच्या घरी पोहोचण्याची.


थोड पुढे गेल्यावर बाजुच्या भात शेतातुन बुजगावणी लावलेले दिसत होती. हिरव्या पिवळ्या शेतामध्ये साधारण आठ-दहा हाताच्या अंतरावर एक- एक असे बुजगावणे लावलेले असत. त्याचे पाय म्हणून दोन जाड बांबू रोवले जात, वरती सुक्या गवताच्या पेंढीवर स्त्री किवा पुरुषाचे रंगीत- संगीत कपडे चढवून देत, आणि त्याचे तोंड म्हणुन त्यावरती घरचाच एखादा फुटका माठ पालथा घातला जाई. त्या माठावर जळके लाकुड विझुवन तयार झालेल्या काळ्या कोळश्याने मस्त दोन डोळे, मधोमध नाक, तोंड .... तसेच तो पुरुष असेल तर जाडजूड मिश्या.... असा एकंदरीत त्या बुजगावण्याचा अवतार असे.
तेवढ्यात पाठीमागे कुठेतरी घुंगूरांचा आवाज ऐकु आला म्हणुन मी त्या दिशेने वळले. बाजुने गजुकाकाची बैलगाडी दिमाखात निघुन गेली. वर जाता-जाता " चाकरमाण्यानूssssss , आलाव काय ? मग किती दिसाचा मुकाम ? " अशी जुजबी विचारपुसही त्याच्याकडून झाली. त्याच्या गाडीची बैलजोडी ' सोन्या आणि मोत्या' मला फार आवडे. गळ्यातील सुपारी एवढ्या घुंगूरमाळचा रुणझुण आवाज करत, आणि ती लाल रंगवलेली टोकदार शिंगे दाखवत ते मस्त ऐटीत चालत. विषेश म्हणजे एवढ्या पहाटेच्या धुक्यातही दुरुन सुद्धा उठून दिसत, एवढे पांढरेशुभ्र बैल.
उठा उठा हो साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥ १ ॥
'उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ॥
जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया ॥ २ ॥

घंटानादाच्या तालावर असा अभंगाचा आवाज गाव मंदिरातुन येत होता. मंदिरामध्ये सोनार मामांनी काकड आरतीची तयारी केली होती. म्हणजे आम्ही आमच्या वाडीच्या अगदी जवळ आलो होतो तर...
मला आठवले.....आषाढ शुद्ध एकदशी च्या दरम्यान काकड आरतीची सुरुवात होते. जेव्हा आजोबा मंदीराचे पुजारी होते. तेव्हा काही वेळा, मी ही आजोबांच्या बरोबर भल्या पहाटे काकड आरतीसाठी जायचे. ‘ ‘त्रिगुण काकडा द्वैतघृते तिंबिला ।’ काठीला चिरगूट गुंडाळून त्यावर तेल ओतून पेटवलेली मशाल म्हणजे काकड. पाहाटे स्नान वगैरे करुन, हा काकडा हाती घेऊन कुडकुडत आम्ही मंदीराची वाट धरायचो. हरिनामाचा गजर करत त्या सावळया माऊलीस ऊठवले जाते. दही-दुध-तुप-लोण्याने अभिषेक करुन विठ्ठल- रखुमाईस अंघोळ घातली जाते. याच दही, दुध, तुपामध्ये मध घालुन पंचामृत केले जाते. विठ्ठल- रखुमाईस तलम रेशमी वस्त्रे आणि अलंकार घातले जातात. हळद, कंकू, गंध, फुले, तुळशी, ऊद, बेल, उदबत्ती, निरांजन, कापुर वगैरे वापरुन मस्त प्रसन्न अशी सांग्रसंगीत पुजा असे.

मला काकड आरती आवडण्याचे अजुन एक कारण म्हणजे, देवाला दाखवण्यासाठी बनवला जाणारा नैवेद्य. गावठी मऊसर शिजवलेला तांदूळ त्याच उभा-आडवा चिरलेला गुळ, असेलच तर एखादीच अखंड वेलशी..... अशी भरपुर प्रमाणात दुध घालुन खीर केली जाते. खीर तयार झाल्यानंतर शेवटी त्या मध्ये हलक्या हातानेच, एक छोटासा लोण्याचा गोळा वरुन टाकला जातो. पंचामृत आणि त्या बरोबर ही खीर खाण्यासाठी आम्ही सगळेच उतावीळ असायचो. घरी आईने केव्हा अशी खीर बनवली तरी नैवेद्याच्या खीरीची चव काही औरच.... त्यास कशाची ही सर नाही.
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥

माझ्या मनात काकडा आरतीच्या कितीतरी आठवणी तरळत होत्या, आणि या आठवणीच्या साथीने चालत-चालत मी आमच्या घराच्या खळ्यापुढील पायरीवर पाऊल ठेवले. आम्ही इथवर केव्हा पोहोचलो हे समजले देखिल नाही.
----------
काही ग्रामीण शब्द-
शेण - गोबर
गवताच्या पेंढीवर- वाळलेला गवताचा छोटा भारा
खळ -अंगण

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

शतशब्दकथा- whatsapp



अगं !
मी आणि माझा नवरा म्हणजे ना, अगदी मेतकूट.....
एकमेकांना न सांगताच, डोळ्यांची भाषा ओळखणारे. एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीला, आमचा खंबीर सपोर्ट असतो.
आमचे नाते म्हणजे एक अतुट बंधन आहे हो. आणि माझे पती दिपक  म्हणजे तर प्रेमाचा सागर.
आमच्या आई तर म्हणतात, "आम्ही दोघे म्हणजे, लक्ष्मी नारायणाचा जोडाच."
खरंतर तुला सांगते, 'एकमेकांचा मान-सन्मान ठेवला, की नातं आपोआप फुलत जात बघ.'
चल उद्या बोलू . आता आम्ही दोघे मुव्ही पाहण्यासाठी थोड बाहेर निघालो आहे.
बा...बाय डियर.
सेंड !
" हुश्श्य ! झाला एकदाचा रिप्लाय करून."  Wink
हातातील मोबाईल टेबलवर ठेवून प्रीती उठली.
" दिपूsssss ! काय करतोस एवढा वेळ ???
आज तरी, तुझा चहा वेळेवर मिळेल का " ?

😂😂😂
(whatsapp ?)

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

या वळणावर...

" कोणाला उशीर झाला, तर हल्ली खुप धास्ती वाटते. पण हाच थोडा उशीर हा, थोडा करता-करता थोडा जास्तच व्हायला लागला की वाटतं, एवढा उशीर पण होऊ नये, की आयुष्याची संध्याकाळ समोर येऊन ठेपलेली असेल.
जस नकार पचवण कठीण असतं, तसच उशीर पचवण थोडं कठीण झालं आहे हल्ली. तरीही मी खुप भाग्यवान आहे. कारण त्या एका संध्याकाळी भेटलेला तो, आयुष्याची संध्याकाळ येई पर्यंत वाट बघण्याच बळ देऊन गेला. आणि हे वाट बघणं कस सुसह्य होऊन गेलं. अशी मी नेहमीच त्याची वाट बघत बसते. कधी मनातचं, तर कधी प्रत्यक्षात. आणि मला ते आवडत ही."
एक आगळ वेगळ तेज राधाच्या चेहर्यावर झळकत होत. गुलाबी छटा होती ती. तिच्या प्रेमाची....पहील्या प्रेमाची म्हणा ना.
" पण हा अजुन का आला नाही "? तिचा तिलाच प्रश्न.
राधा या विचारात असताना, अचानक तिच्या पाठीवर हलकीशी थाप पडली....अपेक्षित होत त्या प्रमाणे माधव क्षणमात्र तिच्याकडे पहात, जवळ उभा होता.
राधा : आलास तु ? पण काय रे हे ! नेहमी प्रमाणे उशीर केलास !
माधव : तुला भेटायच तर टकाटक तयार होऊन याव लागतं. तुझा आवडता व्हाईट शर्ट घातला आहे बघ.
कसा हॅन्डसम दिसतोय ना ?
राधा : हो. अजुन ही तुला आवरायला वेळ लागतो म्हणजे काय म्हणायच ! पण खर हा...अगदी टकाटक दिसतोस.
नेहमी प्रमाणे !
माधव : अरे तु तर खानदानी मधुबाला आहेस. झोपेतुन उठून आलीस तरीही कोणी नाव ठेवणार नाही.
आणि ही, मी दिलेली साडी आहे ना गं? ( तिच्या साडीकडे निरखून पाहत) छान शोभून दिसते तुला.
राधा : हो माझ्या गेल्या वाढदिवसाच्या वेळी दिली होतीस ना ही साडी. विसरलास का ?
माधव : नाही ग, कसा विसरेन! तुझा आवडता कलर फिकट गुलाबी, आणि बारीक विणकाम केलेली जरी.... केवढी शोधा- शोध करुन मला ही साडी सापडली. तुला जशी पाहिजे होती तशी आहे. फिकट गुलाबी आणि बारीक जरी वाली.
राधा : माधव तुला आठवतो का रे तो दिवस ? आपली पहिली भेट....याच निंबोनीच्या बागेमध्ये....तेव्हा हे लोखंडी झोपाळे नव्हते . झुले होते ते पण वेलींचे . बाजूचा चाफा पण बहरलेला असायचा. मधुमालतीचा वेल अशोकालगत आभाळा पर्यंत जायचा. जणु त्याने नभीच्या चांदोबाला आपली गुलाबी-पांढरी फुले अर्पण केली असावी. ती फुलझाड जाऊन आता बघ कसे सगळे चिनी आणि जर्मन रोझ फुलले आहेत. आणि तुला आठवतय का ? त्या-त्या कोपर्‍यात एक पांगारा होता, तो काट्यांमध्ये पण मनसोक्त फुलायचा.
'एका संध्याकाळी वळणाची एक वाट चुकले होते मी. मग मिळेल त्या वाटेने पुढे आले... इथे. आणि तु तर आधीच चुकार पक्ष्याप्रमाने, इथे मृगजळ शोधत बसला होतास. मग इथेच भेटत राहीलो आपण. आणि इथेच प्रेमाच्या आणा-भाका झाल्या.'
आणि ते बघ ! तिथे एक निशिगंध फुलायचा. सोबत जाई-जुई ला घेऊन...तिथे ना छोटस तळं होत वाटतं !...हो ना रे ? आणि तु मला भेटायला सायकल वरुन यायचास ना? एक शायरी पण म्हणायचास...आठवते का ती शायरी ?
माधव : आठवतय गं सगळं. अगदी काल पर्वा घडल्या सारख!
' नहीं कर सकता है कोई वैज्ञानीक मेरी बराबरी, मैं चॉन्द देखने सायकल से जाता था.'
हिच ना ती शायरी ?
राधा : होय. 'चॉन्द' म्हणायचास मला. आणि....आणि ते..... !
' शांतपणे माधव च्या खांद्यावर डोके ठेऊन राधा आठवणी ताज्या करत होती. मधेच डोळ्यातुन ओघळणारा अश्रु त्याच आवडत्या गुलाबी साडीने पुसत होती.
त्या फिकट गुलाबी साडी प्रमाणे वातावरण ही काहीसे गुलाबीसर झाले होते. आनंदघनाच्या येण्याची चाहुल होती ती....या वळणावरील त्या दोघांच्या आयुष्याची संध्याकाळ होती ती. '
०००००
आपली कवितेची वही सांभाळत बागेच्या दुसर्‍या टोकाला बसलेली मी हे सार पाहत होते...ऐकत होते....आयुष्याचे एक सुंदर काव्य.
खरच कोणी तरी अस भेटाव एखाद्या वळणावर. मग अपेक्षित ठिकाणी पोहोचायला उशीर झाला तरी चालेल, ते वळणा-वळणाच आयुष्य एक अपेक्षित अस सुंदर वळण घेतं. आणि मग आपण हून आपणच वळतो या वळणावर.
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
."
बाजूच्या पारावर बसलेला एक तरुण, शेजारच्या तरुणीला सांगत होता... "ते बघ माधव काका....माझ्या शेजारी राहतात. आणि त्या राधा काकु, त्याच प्रेम होत एकमेकांवर, पण घरचे आणि परिस्थिती पुढे हताश. त्यांना लग्न करता आले नाही. घरच्यांच्या आवडी प्रमाने लग्न करुन, आप-आपले संसार त्यानी प्रेमाने संभाळले, जोडीदारा बरोबर ही प्रामाणिक राहीले. या दोघांचं एकमेकावरील प्रेम मात्र न कोमेजणार होत. एवढ निस्सीम प्रेम की, या साठीच्या वयात नियतीने देखील माघार घेत त्यांच्या प्रेमाला अजुन एक संधी दिली आहे. आता दोघांचेही जोडीदार हयात नाहीत."
       

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

गुळा-नारळाच्या पुर्‍या/वडे/घारे-नारळी पौर्णिमा स्पेशल



साहित्य
२ वाटी तांदळाचे पीठ (साधारण पाव किलो), 1 मोठया नारळाचा (संपूर्ण) चव/ किस, 1 वाटी गूळ(आवडी प्रमाणे कमी /जास्त घेऊ शकता).
किंचीतसे मीठ, पाव चमचा जायफळ पूड आणी वेलची पूड, तळण्यासाठी तेल. २ टिस्पून तूप.

कृती-
पराती मध्ये थोडेसे पाणी घालून बारीक मिक्सर केलेला नारळाचा कीस घालून घ्या.त्यामध्ये बारीक केलेला गूळ घ्यावा.
आता यात जायफळ पूड, वेलची पूड आणी किंचीतसे मीठ मिक्स करून घ्या. या तयार मिश्रणा मध्ये जेवढे मावेल तेवढेच तांदळाचे पीठ थोडे-थोडे मिक्स करायचे. नारळाचा कीस हा तांदळाच्या पीठा पेक्षा थोडा जास्त असला पाहीजे, तरच याला छान टेस्ट येते. हे मिश्रण अजिबात पाणी न वापरता तयार करायचे आहे. शेवटी तयार मिश्रण थोडे तूप हाताला लावून मऊसर मळून घ्यावे. तयार मिश्रणाचा गोळा झाकून अर्धा तास तसाच बाजूला ठेवून द्यावा. यामुळे ते व्यवस्थित मिळून येते. तसेच गुळाचे थोडे मोठे असलेले तुकडे देखील विरघळून जातात.
तयार पिठाला तुपाचा हात लावून लहान-लहान गोळे बनवून त्याच्या छोटया-छोटया पुर्‍या करून घ्याव्या.(श्रीखंड पुरी करतो त्या मधील पुरी प्रमाणे) थोडी जाडसर, पण आकाराने छोट्या अश्या पुर्‍या थापाव्यात. तेल कडकडीत तापवून घ्यावे. आपण वडे तळतो त्या प्रमाणे या पुर्‍या तेला मध्ये मध्यम गॅसवर दोन्ही साईडने मस्त खुसखुशीत, लालसर रंगावर तळून घ्यावे. नारळी पौर्णिमेला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यासाठी आम्ही अश्या पुर्‍या/ वडे करतो. नारळी भाताला पर्याय म्हणून. फार तर २० मिनिटांत या तयार होतात. दुधा बरोबर,चहा बरोबर किंवा सकाळचा नाष्टा म्हणून खायला हरकत नाही. चविष्ट लागतातच आणि पौष्टिक ही आहेत.


*या पाककृती मध्ये तांदळाचे पीठ वापरत असल्याने काही ठिकाणी याच रेसिपी ला ‘गुळा- नारळाचे वडे' असे देखील म्हणतात. 'घारे' असे ही म्हणतात. साहित्य वगैरे विषेश काही लागत नाही. अगदी सहज-सोपी पाककृती आहे. ओभड-धोबड पणे घाई-घाई मध्ये करण्याजोगी रेसीपी आहे.
* उकडीच्या मोदकाचे सारण उरले असेल तर त्याच्या देखील सेम अश्याच तांदळाच्या पिठा मध्ये मिक्स करून पुर्‍या बनवता येतात.
* मैदा आणि गव्हाचे पिठ एकत्र करुन ‘नारळाच्या पोळ्या किंवा सांजोर्या/ साटोर्‍या' बनवल्या जातात. ती रेसिपी वेगळी आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
"आमच्याकडे कणीक वेगळे मळुण घेतले जाते. त्यामध्ये घातले जाणारे सारण हे उकडीच्या मोदकाच्या सारणा प्रमाणे असते. हे सारण पुरणपोळी च्या, पुरणा प्रमाने कणकेच्या गोळ्यामध्ये आत भरले जाते. आणि पोळी प्रमाणे लाटुन केल्या जातात."

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

बहकीसी बारीश ने फीर...

हिरवाई चा शालू लेउनी ही धरा उभी आहे स्वागतासाठी. झाडा, फुला-पानां वरती, घरावरती, छपरावरती अन मनावरती येणारी मभळ बाजुला सारुन सैरभैर पळणार्या ढगांचा लपंडाव सुरु झाला आहे. कडक उन्हाचा दाह शमवण्यासाठी कातर वेळेस नभ उतरु लागले आहेत. अशा वेळी रातकिड्यांची किर्र आणि काजव्यांची सोनेरी रांगोळी सळसळणार्या गवताच्या पात्यामध्ये नवलाईचे स्मित घेउन आली आहे. मदनाचे चाप जणू असे ईन्द्रधणू नभी उमटले आहे. चींब भीजूनही चमचमणारे ऊन म्हणजेच नव चैतन्याचा जन्म झाला आहे. कारण ऋतुचे सोहळे घेऊन आता माझा श्रावण आला आहे . सौदामीनीचा लखलकाट, मेघांचा कडकडाट, तृप्तीचे घन, मातीचा सुगंध आणि वार्याची मंजूळ शीळ अशा मंगलमय आणि आनंदी वातावरणात श्रावणाचे आगमन झाले आहे.
"जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा !
श्रावणात घन निळा बरसला."
कुठे या नर्तक मोराने आपला स्वाभीमानी पिसारा फुलवला आहे. तर कुठे माझ्या कृष्णाने त्याच्या मुरलीचा सुर लावला आहे. कारण आता श्रावण आला आहे. त्या चातकाला जाउनी सांगा कुणीतरी आखेरीस तुझा श्रावण आला आहे.
हा ऋतु असा आहे की कोणाला तरी चींब भीजावस वाटते. तर कोणाला तरी छत्रीतुन भीजताना पहावस वाटत. तर कधी इंद्रधणू च्या रंगा मध्ये रंगुन जाव अस वाटत. पाऊसात वार्यावर फड-फडणारा विहंग होऊन कधी उंच झाडाच्या फांदीवर बसुन ऐटीत  झुलावस वाटत. त्या  नभीचे चुंबन घेउन कधी खळाळणारर्या सरीते मध्ये थेट बुडाव अस देखील वाटत.
"अशाच पावसात कधी मनसोक्त भीजलो सोबतीस घेऊन कोणा"..... अशा आठवणी सुद्धा या श्रावणातच बहरतात.

बहकीसी बारीशने फीर

यादोंकी गठरी खुलवाई,
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

कुछ सुनेसे सन्नाटे थे
और ख्वाहीशें दबी दबी
यूँ रखें थे कुछ अरमान
छोड़ा हो जैसे अभी अभी
चद्दर सी उम्मीद मीली
कई जगह थी सील्वाई 
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

हर सीलवट मे ग्ठरीके
बुनेबुनाये ख्वाब मीले
भीगी चांदनी रातोंके
महकेसे महताब मीले
सीमटीसी खुदहीमे और
इक तहजीब नजर आयी,
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!
                 बहकीसी बारीशने फीर अशा कितीतरी नव्या-जुन्या,चांगल्या-वाईट आठवणींना जागे केलेले असते.
" लहानपणी ओढा ओलांडताना बाबांनी पकडलेला हात असो, किवा लपुनछपुन पावसात भीजुन, घरी आल्यावर पाठीवर पडलेला आईचा हात असो. कुण्या जीवलगाचा हातात हात धरुन तासनतास भीजने असो, कधी अशाच पावसात सवंगड्यांच्या हाताची साखळी करुन केलेली मज्जा असो. " प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्यात पावसाची अशी एक तरी वेगळी आठवण असते.
" नवी नाती, नव्या रिती याच पावसाच्या साक्षीने जुळतात. वाट हरवलेली पाखरे याच पावसात पुन्हा मिळतात, रुसलेले-फसलेले क्षण आपसुकच बहरतात, बहराची धुंदी घेऊन तरुवरा प्रमाने लहरतात. कधीही न जुळलेले बंध याच पावसात सलत राहतात, कुण्यातरी वेड्याच्या गालावर आठवणींचे थेंब ढळत असतात."
               कधीतरी... अश्याच पावसाच्या अगणीत थेंबाना आपल्या हाताच्या ओंजळीत धरु पाहणार माझ मन दुरवर कुठे तरी  पोहोचलेल असत. आणि अश्याच कधी काळच्या भीजलेल्या आठवणींना शोधुन-शोधुन मोजत बसलेल असत. मग वेळ कसा नीघुन जातो काहीच कळत नाही. पाऊस मात्र परतीच्या प्रवासाला निघाला आहे हे मन मानत नाही. मध्येच केव्हा लक्षात येत ! "अरे पावसात भीजायच होत, राना-वनांत भटकायच होत, वाफाळता चहा आणि गरमा-गरम भजीचा स्वाद घेत गप्पा गोष्टींत रमायच होत. हे जमल नाही तरी अजुन थोड नहायच बाकी आहे, थोडस बागडायच बाकी आहे, थोड अजुन उंदडायच बाकी आहे, थोडसच धडपडुन मग थोडसच रडायच बाकी आहे पाऊस असताना."

यातल काही जमल नाही तर गुरू ठाकूर म्हणतात तस, 
"झरे मेघ आभाळी तेव्हा, क्षणभर आपुले वय विसरावे.
नाव कागदी घेउन हाती, खुशाल डबक्यात रमावे."

आणि हे सुद्धा नाहीच जमले तर, "व्याकुळ अशी नक्षत्रे कोरडीच जाती,भीजण्याच्या आशेवरती कोमेजुन गेल्या राती" अस म्हणण्याची वेळ येईल एवढ मात्र नक्की.



शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

स्कॉलरशिप-एक योगा-योग

हदय विकाराच्या झटक्याने मंत्री लोहिया यांचे रुग्णालयात निधन.
वृत्तपत्र खाली ठेवून मी चहाचा कप हातात घेतला. "माणूस आणि मंत्री म्हणून दोन्ही बाबतीत ते वाईटच होते. पण त्यांना माझ्या हाताने मरण आले नाही. हे माझ्यावर त्या परमेश्वरालचे फार उपकार आहेत. एखाद्याच्या मृत्यूस आपण जबाबदार असने हे फार वाईट. फार म्हणजे फारच वाईट. अपराधीपणाची भावना जगू देत नाही आणि पोलिस शोधात पकडले गेले तर जन्मठेपेची शिक्षा. यापासून कोणी ही वाचवू शकत नाही."


०००
४ मार्च २००० ची गोष्ट. मिसेस माने आणि त्यांची मुलगी रेवा केबिन मध्ये बसल्या होत्या. भल्या मोठ्या लाईन मध्ये ४ तास उभे.
गेले चार महिने रोज येऊन ही काही उपयोग झाला न्हवता, पण आज विशेष शिफारस मिळाली होती, म्हणून त्यांचा नंबर आज लवकर आला होता.
खुप महत्वाची गोष्ट . रेवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार होती. शासनाची तशी स्कॉलरशिप मिळाली होती. मात्र शासनाने मंजूर केलेली आर्थिक मदत प्रत्यक्षात न मिळाल्याने घरचे सारे चिंतेत होते. सार्या ठिकाणी विचारपूस करून त्या ईथवर पोहोचल्या होत्या.
०००
रेवा: आई काहीही झालं तरी तू त्या फॉर्म वरती सह्या करू नकोस. आपण काहीतरी दुसरा ऑप्शन पाहुया. मला परदेशी शिक्षणासाठी जायची संधी मिळणार नाही ना? हरकत नाही. पण तू माघार घेऊ नकोस.
मीसेस माने: रेवा मला कळत गं सगळं. प्रत्येक्षात ६ लाखाचीच मदत आपल्यालाह मिळणार असली, तरीही ते आपल्यासाठी महत्वाचे आहे. कारण ही मदत १ महिन्याच्या आत मिळाली नाही तर तुझं जे नुकसान होईल, आणि ते मी पुढे कधीही भरून काढू शकणार नाही.
रेवा: अगं आई पण ६ लाख आपल्याला आणि ६ लाख तो मंत्री स्वतःच्या खिशात घालणार ना ! त्याला फुकटचे पैसे का द्यायचे.
मी.माने: हे बघ रेवा , आपल्या सारखे गरजू लोकांना खूप आहेत ग ! बहुतेकांच्या बाबतीत असंच होतं असतं. त्या मंत्राने सही नाही केली, तर मिळणारा निधी सुद्धा कॅन्सल होईल. आपल्याला मदत हवी आहे. आणि त्या बदल्यात त्याला मोबदला.
आता अजून प्रश्न विचारू नको. निघ झटपट. आजच सगळ्या फॉरम्यालीटीज पुर्ण करुन येऊया. मनाला पटत नसेल तरीही काही गोष्टी कराव्या लागतात.
शहरा पासून थोड दूर असणाऱ्या एका शासकीय कचेरीत मी.माने आणि रेवा बसल्या होत्या. तिथे तुरळकच लोक होते. कोणी आपले अडकलेले व्यवहार मार्गी लावण्यासाठी तर कोणी आपले खिसे भरण्यासाठी आले असावे, बाकी एवढ्या निर्जन ठिकाणी सहज कोण येणार. २-४ स्टाफ आणि २ शिपाई एवढाच काय तो लावाजमा.
सगळे कागदपत्रे रेडी होते, रेवा अन् माझ्या सह्या झाल्या होत्या. मंत्र्यांच्या सही साठी आम्ही वाट बघत होतो. आणि शिपायाने 'मी. माने' म्हणून आवाज दिला. एका वेळी फक्त एकाला केबीन मध्ये जाण्याची परवानगी होती. म्हणून मी आत गेले. माझी कागदपत्रे बघून लोहिया यांनी लगोलग सगळ्या सह्या केल्या. जणू काही माझ्यापेक्षा त्याला याची जास्त गरज असावी. मला तो एक नंबर हलकट माणूस वाटला. अगदी ऐकलेली किर्ती बरोबरच आहे अशी त्यांची मुर्ती होती.
"हा तुमचा फॉर्म घ्या. पैसे मंजूर झाले आहेत". एका छोटुने आणून दिलेला चहा संपवत त्यांनी माझ्यापुढे एक कागद सरकवला. कुण्या मीसेस कानेंचा कागद होता तो. तीच्या शासकीय सेवेतील निवृत्त आईच्या मोठ्या मेडिकल सर्जरी साठी निधी मंजूर झालेला होता. काहीतरी गफलत होते म्हणून मी फॉर्म परत केला. " सर हा माझा फॉर्म नाही. मी मिसेस माने. आणि हा फॉर्म कनेंचा आहे. नाव आहे मिसेस मेधा काने." हे वाक्य माझ्या तोंडून बाहेर पडत नाही पडत तोच एक झुपकेदार दाढीवाला, उंचपुरा इसम लगबगीने दार उघडून तडक आत आला होता. मी त्याच्याकडे पाहते न पाहते तोच मिस्टर लोहिया बसल्या जागी खुर्ची वर कलंडले, त्यांचे डोळे अर्धवट उघडे पण मान थोडी वाकडी झाली होती. मला काय करावे तेच सुचेना. लोहियांच्या हाताला चेक करत असताना मी पाहिले, त्या इसमाने चहाचा कप उचलून आपल्या जवळच्या प्लास्टिक पिशवी मध्ये टाकला. " म्हणजे तो चहा पिऊन मंत्री डेड झाले किंवा काय ?" माझ्या तोंडून शब्द निघाले. आणि त्या इसमाने लगोलग छोटी गण काढून माझ्या डोक्याला लावली. छोटी गण प्रत्येक भाग सुटा होतो ती. सेप्रेट केले तर तीचे ७-८ भाग होतात आणि ते गण चेच तुकडे आहेत हे देखील कोणालाही सहज लक्षात येत नाही. सहज कॅरी करता येण्यासारखी गण होती ती. सिआयडी मध्ये अशी गण पाहिल्याने मला हे माहीत होत. ती प्रत्यक्षात असते हे आज समजल. मला आता घाम फुटला होता, तरीही "कोण तू ? का मारलं यांना? मी सगळ पोलीसांना सांगेन." म्हणत मी आरडा ओरडा चालू केला. त्यांने गण अजून जवळ आणत दरडावले, " मिसेस काने ! न बोलता गुमान बसून र्हा. हा मंत्री अजून जित्ता हाय, चहा मंदी गुंगी आणणार औषध टाकल व्हतं. पण जर म्या सांगतो तसं तुमी केले न्हाई ना, तर आमच्या ताब्यात असलेली तुमची माय जित्ती र्हायची न्हाई.
"माझी आई तर केव्हाच देवा घरी गेली होती. हा काय बोलतो ते मला कळेना ". कानशिला जवळ लावलेल्या बंदूकी च्या भीतीने मी शांत बसले होते. त्याने त्याच्या मोबाईल मधून एक व्हिडिओ दाखवला खरंच कोणी म्हातारी लागले दोराने बांधून ठेवले होते. आईच्या वयाची. अगदी माझी आई आता हयात असती तर अशीच दिसली असती. मला फार वाईट वाटले.
आता मला परिस्थितीचा अंदाज येऊ लागला. "माझ्या आईला काही करूं नका प्लीज. मी तुम्ही सांगाल ते करते" प्रसंगावधानाने मी सावरत म्हणाले. तर ऐका हा मंत्र बेसुद्ध हाये, पण भायर समदयांना सांगायचा की ह्याला ताबडतोब हास्पीटलात न्ह्यावा लागलं अन् ह्दयाच आप्रेशन करावं लागलं , अन् हो आपरेशना दरम्यान हा ढगात गेला पाहिजे. कस काय करायच ते तुमी बघून घेयाच. आलं का ध्यानात." तो दात विकत म्हणाला. "डायरेक्ट ढगात, पण मी असं नाही करु शकत. बाकी तुम्ही सांगाल ते करण्यासाठी मी तयार आहे " मी विनवणी केली. पण व्यर्थ त्यांने आधी पासून सगळं व्यवस्थित प्लानिंग केलं होतं. कोणी डॉक्टर काने बाई इथे मंत्र्यांच्या भेटीला येणार आहेत हे या लोकांना आधी पासून माहित होते. तिच्या आईला ओलीस ठेवुन सगळं काही मॅनेज केलं गेलं होत. मिस्टर लोहिया यांचा काटा काढण्यासाठी पद्धतशीर पणे रचलेला केलेला कट होता हा. 'मा' चा 'का' झाला होता. आणि मी यात डॉक्टर काने बाई म्हणुन नाहक अडकले होते. माझा मोबाईल वगैरे सर्व त्यांने काढून घेतले होते. तो इसम आधी पासुनच मिस्टर लोहियांच्या सिक्युरिटी मधे सामील असल्यानल, सर्व माहीती त्याने आधीच मिळवीली होती. मला दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही. काही सुतालाही खबर न लागता, 'हु' का 'चू' न करता माझ्या संकट मंत्रांची रवानगी दवाखान्या मध्ये झाली. कोणीही काही संशय देखील घेतला नाही आणि लोहियांचा एक फॅमिली डोक्टर, म्हणजे मी, ऑपरेशन थेटर मध्ये गेले. डोक्टर काने म्हणून.
ऑपरेशन थेटर च्या बाहेर तो माणूस फोन वर बोलताना मी गुपचूप ऐकत होते. " आरररर गावली की लका ती काने बाई, सकाळ पासन लाईन मंदी लक्ष ठवून हूतो, पर कोण बी काने गावली न्हाई. मंग केबीन भाईर उभं र्हायलो, अन् आतन आवाज आला मिसेस मेधा काने. समद येळेवर झालं, च्या बी येळेवर आला आणि सायेब बी इतक्यात आडवा झालता. काय काळजी नगं . समद निटच व्हईल रं".
"म्हणजे काने बाई इथे आल्याचं न्हवत्या तर "..... माझा मलाच प्रश्न.
लोहिया यांचे हितचिंतक आणि नातेवाईक हॉस्पिटल च्या बाहेर जमा व्हायला लागले होते. गर्दी वाढत होती. सगळी ओपचारीकता झाल्यावर, मी अर्ध्या एक तासाने बाहेर येऊन सगळ्यांना सांगितले की मिस्टर लोहिया इज नो मोअर.
०००
आज मी स्वस्थ बसले....अगदी निवांत. जवळपास महिना उलटला. या घटनेनंतर रोज मी ४ मार्च चा पेपर उघडुन बसते.... तिचं ती पानं चाळत.....काही विशेष मिळत का ते शोधते.
काय योगा-योग असतो ना !
" त्या दिवशी नावात गडबड झाली.... 'का' चां 'मा' झाला आणि मी केबीन मध्ये गेले.... फॉर्म पाहिल्यावर, तो 'काने' चां आहे म्हणून परत केला. माझ्या तोंडून बाहेर पडलेले 'मिसेस मेधा काने' एवढेच शेवटचे शब्द ऐकून, मलाच काने समजून, तो इसम लगबगीने आत आला.... चहा पिऊन लोहिया बेशुद्ध झाले.... हे बघून पुढच्या घटना घडल्या. रेवा त्याच वेळेस फोन वर बोलत त्या सरकारी कचेरी पासुन थोड लांब बाहेर गेली होती, आणि मी लोहियांच्या सिक्युरिटी स्टाफ बरोबर दवाखान्यात रवाना झाले. तिने मला पाहिले असतें, तर कदाचित काही तरी वेगळाच प्रसंग उद्भवला असता. देव जाणे पण हा निव्वळ योगायोग जुळून आला.
त्यानंतर ४ दिवस मी कुठेही बाहेर पडले नाही, घडल्या प्रकाराचा मला जाम धक्का बसला होता. त्याच दरम्यान मला 'तुमच्या आईला सुखरुप घरी सोडले आहे' म्हणून एक निनावी फोन येऊन गेला.
मी रेवाला ही त्या दिवशी काय झालं? मी कुठे गायब झाले होते ? हे वरवर काहीतरी सांगून शांत केले.
मुख्य म्हणजे पाचव्याच दिवशी शासना कडून रेवासाठी पुर्ण रकमेच्या स्कॉलरशिप मंजुरी चा फोर्म आला होता. आणि सोबत पहिली चेक ही होता. उशीरा का होईना पण आम्हाला हवी असणारी गोष्ट घडली होती. म्हणजे स्कॉलरशिप ठरल्या प्रमाणे मिळणार होती पण थोडा उशीर झाला होता एवढंच. तो लोहिया आम्हाला विनाकारण फसवणार होता, हे आता उघड झाले होते.
या सगळ्या मध्ये एक गोष्ट महत्वाची की लोहियांच्या मृत्यू साठी मी अजीबात जबाबदार न्हवते. जबाबदार न्हवते ? अस मी म्हणते कारण 'लोहिया खुर्ची मध्ये कलंडले तेव्हाच डेड झाले होते'.
खरंच त्यांना ॲटाक आला होता. हि गोष्ट मला क्षणार्धात समजली कारण मी ही एक नर्स आहे. मी त्या इसमाला हि गोष्ट ओरडून ओरडून सांगितली पण त्यांने ऐकलं नाही. उलट मी खोटं बोलते असं समजून अजुन दरडवायला सुरूवात केली. यात काही अघटीत घडू नये म्हणून मी शांत बसले. दवाखान्यात ईतर डॉक्टर आणि नर्स सोबत अर्धा एक तास असाच वाया घालवून, मी जेव्हा पद्धतशीरपणे सगळ्यांच्या समोर येउन लोहिया गेल्याच जाहीर केल, तेव्हा तो इसम पसार झाला होता. पुढच काहीही त्याने ऐकुण घेतल नाही. लोहियाचा मृत्यु हार्ट अ‍ॅटॉकने आधीच झाला होता, ह्रदय शस्त्रक्रियेने नाही.
त्या कानें बाईंच्या आईला वाचवण्यासाठी मला हे नाटक करावे लागले. आणि त्याने माझं काहीच नुकसान न होता फायदाच झाला. माझ्या लेकिला तिच्या हक्काची स्कॉलरशिप मीळाली होती. आणि त्या लोहियाला त्यांच्या नशिबाची जागा.

( काही गोष्टी गृहीत धरून रचलेली, पुर्णपणे काल्पनिक अशी ही कथा आहे. कोणतीही व्यक्ती, ठिकाण, वस्तू यांच्याशी काहीही संबंध नाही. याची कृपया नोंद घ्यावी.)

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

मच्छी कढी - (pomfret curry) / fish curry


साहित्य:- माशांना मॅरिनेट करण्यासाठी.
माशाचे चार-पाच तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावेत. ४-५ कोकमाच्या तुकड्यांना भिजत घालून केलेला रस,  मीठ अर्धा चमचा, पाव चमचा हळद, लाल तिखट अर्धा चमचा.
- माशांना कोकम, मीठ , तिखट,  हळद लावुन १५ मिनिट फ्रिझ मध्ये  ठेवा.

ओला मसाला-
साहित्य:- छोटा कांदा १, लसणीच्या ५-६ पाकळ्या, टोमॅटो १, दोन चमचे धने, अर्धा ओला नारळ खवून,
अर्धी वाटी स्वच्छ धुवून कोथींबीर, आल्याचे छोल्या एवढे २ तुकडे,लाल तिखट अर्धा चमचा चविला+रंगाला, ओली हिरवी मिरची २ ,शंकासुरी मिरची २, बेडगी मिरची २ , मीठ अर्धा चमचा .

ओला मसाल्यासाठी कृती- वरिल सर्व साहीत्य एकत्र करुन घ्यावा, मिक्सरच्या भांड्यात अगदी नावाला पाणी घालुन सगळा मसाला बारीक गंधा सारख वाटुन घ्यावा.



फोडणीसाठी
तेल ४ चमचे, लाल तिखट अर्धा चमचा, लसणीच्या २  पाकळ्या, कढीपत्ता ४ पाने,२ त्रिफळे.



कृती- वरिल दिलेल्या साहीत्याच्या क्रमाने कढई  मध्ये फोडणी करावी. आता या फोडणी मध्ये ओला मसाला घालुन चांगला परतावा , बर्यापैकी तेल सुटु लागल्या वर मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे  घालावे.

थोडे  कोमट/ गरम पाणी घालुन मंद
गॅसवर उकळी काढावी. उकळी मध्ये २ त्रिफळे टाका. थोडी कोथींबीर वरुन भुरभुरा. मच्छी कढी तयार आहे.


  टिप-
1) मॅरिनेट केल्याने- कोकम,मीठ,तिखट, हळद हे माशांमध्ये आत पर्यंत व्यवस्थित मुरते.
2) कोकमाच्या ऐवजी चिंच वापरु शकता.
3) ओला मसाला करताना पाणी जास्त वापरले तर तो फोडणी मध्ये टाकल्यावर वरती-वरती उडतो त्यामुळे पाणी थोडेच घालावे.   
4) लाल तिखट फोडणी मध्ये टाकल्याने चांगला रंग येतो.
5) थोडे  कोमट पाणी या साठी की थंड पाणी वरुन घातल्याने चव कमी होते (आईचा उपदेश).
6) पाणी स्वतःच्या अंदाजाने घाला  किती पातळ किवा जाडसर रस्सा हवा आहे त्या नुसार,जाडसर रस्सा चवदार लागतो.
7) फोडणी जास्त उकळू नये नाहीतर माशांचा खिमा होइल.
8) त्रिफळे टाकल्या वरती मस्त चव येते, पण २ च त्रिफळे टाका, जास्त टाकल्याने थोडी तुरट चव येते.(माझा अनुभव- मागे एकदा अजुन छान चव येईल म्हणुन २-४  त्रिफळे जास्त घातली होती, आणि  सगळा बेत बिघडला होता)
9) वरुन कोथींबीर ऐछीक, पाहीजे तेवढी घाला.


पुडिंग- साधे सोपे आणि झटपट.



साहित्य :-

गरम केलेले घट्ट दूध- पाउण लीटर
साखर - ३/४ वाटी( साधारण १० टिस्पुन पुरे होते).
अंडी - ३ (पाव लिटर दुधासाठी १ अंड हे  माझ प्रमाण)
वेनिला एसेंस - १ टिस्पुन.
आवडत असेल तर केसर 2-3 काडी
किंवा वेलची पावडर 1 चमचा.



सजावट साहीत्य (ऐच्छिक) :-
काजू, बदाम, पिस्ते, स्ट्रॉबेरीस, काळ्या मनुका ई.



कृती :-

कोमट दूधमध्ये साखर मिक्स करा, व्यवस्थित मिक्स झाली पाहीजे. आता ३ अंडी व्यवस्थित फेटुन मध्ये मिक्स करा. वेनिला एसेंस आणि केसर धालुन मिश्रण ढवळुन घ्या. वरुन वेलची पावड भुरभुरुन घ्यावी. हलक्या पिवळसर रंगाचे मिश्रण तयार होईल.
सर्वात शेवटी केक करण्यासाठी तुम्ही जो पसरट गोलाकार डब्बा वापरत असाल त्यात हे मिश्रण घालुन. हा डब्बा कुकर मध्ये ठेवा. मोदक उकडताना आपण जसे पाणी घालतो त्या प्रमाने तळाशी पाणी घालुन १५ मिनिट गॅस वरती वाफवुन घ्यावे,  हे करताना प्रेशर कुकर ची शिट्टि काढुन ठेवावी. जमा झालेली वाफ त्यामधुन निघुन जाउदे. पुडिंग घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.







आता तयार  पुडिंग सेट होण्यासाठी १-२ तास फ्रीज मध्ये ठेवा.
यानंतर सजावट करुन पुडिंग खाण्यासाठी तयार आहे.
* दूध कोमट झाल्यावर वापरास घ्यावे, गरम दूधामध्ये अंडी फोडुन घातल्यास शिजुन अंड्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि अस्तित्वात नसलेली काहितरी भयंकर रेसिपी तयार होईल (स्व-अनुभवावरुन).
* साखर ६-७ टिस्पुन म्हणजे कमी गोड डायबेटीस चा पेशन्ट देखिल खाउ शकतो असे प्रमान. १० म्हणजे मिडियम गोड. यानुसार प्रमान ठरवता येते.
* वेनिला एसेंस १०० मिली ची बाटली ५०रु च्या आसपास मिळते, पुन्हा ७-१० वेळा वापरु शकता. त्यामुळे जास्त खर्च नाही.






* मिश्रण पातळ असताना (केसर किंवा वेलची पावडर लावून पर्याय म्हणून) कोको पावडर सुद्धा घालु शकता. चोकोलेट ची टेस्ट आणि मस्त कलर येतो. लहान मुल आवडीने खातात.


* या मधुन शरिराला भरपुर कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते.
* हि निश्चितच झटपट रेसिपी आहे, फक्त सेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो .

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...