सोमवार, २७ जुलै, २०२०

कपाशीचा पाऊस




'काळ्या मेघाराजाने आभाळात दाटी-वाटी केली होती. वारा भिरभिर घिरट्या घालत होता. फक्त एका थेंबाच्या प्रतिक्षेत कुठेतरी एखादा चुकार चातकपक्षी आवासून आशेने नभाळाकडे टक लावून होता. शेवरीच्या झाडाची बोंड आता चांगलीच तयार झाली. त्यातून निघणार्या सफेद म्हातार्या गोल-गोल भिंगर्या घालत स्वच्छंद विहार करत होत्या. लहानपणी आम्ही त्यांनाच कपाशी समजायचो, आणि ही कपाशी म्हणजे कापसासारखी दिसणारी म्हातारी जेव्हा वार्याबरोबर उडायची, तेव्हा जो पहीला पाऊस यायचा त्याला म्हणायचो, 'कपाशीचा पाऊस'.

'कपाशीचा पाऊस'... विज चमकावी तसं काहीस मला झालं.  नको तो कपाशीचा पाऊस. नकोच त्या आठवणी.  कधी काळी चिंब कोसळलेल्या त्या पावसाने पार भिजवून टाकल या मनाला, एवढं की आता भिती वाटते याची. '

पाऊस यायच्या आधी शाळा गाठावी. मी लगबगीने आपली पर्स सावरत पाय उचलला.

" सुप्रभात बाई! "

 सुप्रभात मुलांनो! म्हणत मी रजिस्टर हातात घेणार, एवढ्यात शिपाईकाका वर्गात येऊन टपकले.

" बाई तुम्हाला स्टाफरुममध्ये बोलावलं आहे. कालचे ते गणेश मानेचे पालक, तुम्हाला भेटायचं म्हणत आहेत. "

" दामूकाका, गणेशचे पालक तर कालच त्याच्या मास्तरांना भेटून गेले ना! आता परत काय आहे? "   मी आश्चर्याने प्रश्न केला.

" बाई जरा येऊन बघता का. तुम्हालाच भेटायचं आहे असं म्हणतात ते. " म्हणत शिपाईकाका निघून गेले. आणि मी सुद्ध्या त्यांच्यामागून माझ्या केबिनकडे निघाले.  गणेशच्या आई आणि तो स्वत: दोघेही आधीच तिथे येऊन माझी वाट पाहत होते.

" हा बोला!  काय म्हणताय काकू."     मी प्रश्न केला.

त्याच्या आई अगदी शांत होत्या, कधी बाजूच्या भिंतीकडे, तर कधी समोरील टेबलाकडे टकमक बघत त्यानी गणेशकडे पाहीले. पण एक शब्द ही त्यांच्या तोंडातून बाहेर पडेना.

" काकू जे असेल ते बिनधास्त बोला. तिकडे माझा वर्ग चालु आहे. मला लवकर जाव लागेल. " मी पाण्याचा ग्लास त्यांच्यापुढे करत त्याना बोलत करण्याचा प्रयत्न केला. दोन… पाच मिनिट अशीच शांतता पसरली. मग मात्र मी गणेशला बाहेर थांबायला सांगून त्या काकुंशी बोलले .

विषय नाजूक होता.

' दुसर्या वर्गातल्या एका मुलीशी गणेशचे प्रेम सूत जुळले आहे, अशी चर्चा शाळेत चालू होती, त्या मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापकांजवळ गणेश विरुद्ध तक्रार ही केली होती. त्यावेळी फार आरडाओरड आणि गोंधळ झाला होता. शाळेत या चर्चेस उधाण आले होते. प्रकरण जरा जास्तच चिघळले. या अशा प्रकारामुळे शाळेला नावं पडायला नको, म्हणून मुख्याध्यापकांनी सहमताने तडक गणेशचे नाव शाळेतून काढून टाकण्याच निर्णय घेतला होता.'

यामध्ये तालुक्यात ही एकच शाळा. आपल्या मुलाचे शालेय नुकसान होऊ नये, ही त्या मातेची कळकळ होती.

मी गणेशला आतमध्ये बोलावल. खरेखोटे मला त्याच्या तोंडून ऐकायचे होते. १४-१५ वर्षाचे ते पोर, पण तो जे काही बोलला, ते ऐकून मला एक झटका लागला. " म्हणे… खरच आवडते मला ती, तिच्यासाठी खुप कष्ट घेईन, मोठा ऑफिसर बनेन, पण आता मी अभ्यासात लक्ष देईन, कोणालाच त्रास वैगरे होईल अस यापुढे वागणार नाही."  त्याने प्रामाणिकपणे सारं काही कबूल केल. अगदी कोणतीही गोष्ट न लपवता. मी देखिल त्याला समजावलं. ' अद्याप तरी तू खुप लहान आहेस. पण समजुद्दार आहेस. सध्या या सगळ्या गोष्टींपेक्षा अभ्यास महत्वाचा आहे. शिकून खुप मोठा हो.  बाकी सगळ्या गोष्टी त्या त्या वयामध्ये आपोआप होत जातात. मी मुख्याध्यापकांनी बोलेन पण लक्षात ठेव यापुढे यासंदर्भात तुझी एकही तक्रार येता कामा नये. '

गणेश आणि त्याची आई निघून गेले. मी तडक आबांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना गणेशला एक संधी देण्यासंदर्भात विनंती केली. एका मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न होता. शिक्षण नाही तर त्याला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळणार नाही.  जिल्ह्याच्या शाळेत घालून त्याला शिकवण्याएवढी त्या माऊलीची परिस्तिथी नव्हती.  मी प्राध्यापक म्हणजेच आबांशी, त्या मुलाच्या भवितव्यासाठी एक संधी मागितली, पण आबांनी साफ नकार देऊन या विषयी काहीही न बोलणे पसंत केले.  मी खजिल मनाने माझ्या वर्गाकडे जायला निघाले आणि तेवढ्यात कोणीतरी मला हाक मारली. आवाजाच्या दिशेने सहज लक्ष टाकले तर तिथे गौरी उभी होती.  माझी एक हुशार विध्यार्थीनी.

" गौरी तू .... काय गं? वर्गात गेली नाहीस का? "

" नाही बाई, मी जिल्ह्याच्या शाळेत शिकायला जाते. आजच दाखला देऊन आले. खर तर तुमचे आभार मानायचे होते, म्हणूनच इथे आले. "

" आभार कसले गं? "      मी अती आश्चर्याने प्रश्न केला.

" बाई गणेशला एक संधी दिल्याबद्दल आभार!  तो भेटला होता मला.  माझ्यामुळे त्याच नुकसान होऊ नये, म्हणुन मी स्वतःच बाहेरच्या शाळेत शिकायला जाते. त्याला इथे शिकूदेत. "    आजूबाजूचा कानोसा घेत तिने सगळे स्पष्ट केले होते. आता कुठे माझ्या लक्षात यायला लागले. 

" बाई आम्ही चुकीच काही केल नव्हत हो! कधीतरी येताजाता भेटायचो, पण शाळेतल्या मुलांनी एकाच दोन करुन काय मनाला वाट्टेल ते सगळीकडे पसरावलंय.  जेव्हा मिट्टीन्ग झाली, तेव्हा मला कोणीही काही बोलण्याची संधी दिली नाही. पण आता जेव्हा गणेशला एकट्यालाच दोशी ठरवून, शाळेतून  काढणार समजले, तेव्हा मी सारे काही घरी सांगून टाकले, आणि स्वतःच शाळाही बदलण्याचा निर्णय घेतला. यापुढे कोणाला त्रास होईल अस अजिबात  वागणार नाही. " बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. परत एकदा आभार मानून ती जड पावलांनी निघूनही गेली.

खरतर आबांनी गणेशला शाळेत ठेवण्याची परवानगी तर दिली नाहीच. मला माझीच लाज वाटली, आणि तिच कौतुक. कारण आज तिच्यामध्ये असलेला प्रामाणकपणा काही वर्षांपूर्वी मी दाखवला असता तरतर असाच कोणतरी गणेश एकटाच दोशी ठरला नसता. पण तेव्हा ते साहस माझ्यामध्ये नव्हते.  मी एका लाचारासारखे परिस्थिती पुढे हात टेकले होते. पण नाही ... आता नाही. आज परत आबांना मी जिंकू देणार नाही.

मी तडक निघाले ते मॅनेजमेंट कमिटीकडे. पण नेहमी प्रमाणेच आबा समोरच उभे होते. मी काही बोलण्याच्या आधीच त्यांनी मान डोलावली.

" मनू! गणेशला उद्या वेळेवर यायला सांग. आणि हो!  या वर्षी देखिल तो वर्गात पहिला आला पाहिजे, ती जबाबदारी तुझी. "

 एवढं बोलून ते निघूनही गेले.

कदाचित माझं आणि गौरीच जे बोलन झालं ते त्यांनी ऐकल असाव. कदाचित परत एकदा त्यांना या गौरीची माझ्यासारखी मनू करायची नव्हती.

कदाचित तेव्हा अशीच एक संधी जर त्याला मिळाली असती तरतो... तो...

' विसर मनू.... एवढी वर्ष झाली, पण तो अजूनही मनात तसाच आहे. स्वतःला जगापासून बंधीस्त करुन ठेवल मी, कोणाला आयुष्यात सामील करुन घेतल नाही. पण त्याला नाही विसरले, विसरता आलच नाही. 

कुठे असेल तो? काय करत असेलमी, मी आठवत असेन का त्याला? कदाचित तो त्याच्या संसारात ही रमला असेल.'

मी माझ्याच विचारांत वहात चालले होते. जुन्या कटू आठवणी उगाळत मुक अश्रू ढाळीत होते. अचानक जोराने विज कडाडली आणि क्षणात सार्‍या विचारांची आहुती देऊन ती निघूनही गेली. मला नको असणारा कपाशीचा पाऊस परत एकदा सुरु झाला होता, माझ्या मनात... आत... खोलवर… आणि बाहेर ही…   

*************************************************

"मनू, ते नवीन चेअरमन भेटायला येणार आहेत. खरतर मीच आग्रह करून बोलावलं आहे त्यांना. तू ही येते का बाहेर? तेवढीच भेट होईल."   आबांनी अंगणातूनच ओरडून मला हाक दिली होती. 

 नवीन चेअरमन ते कशासाठी? मला काही समजेना.

"आबा, कोण नवीन चेअरमन? मला काहीच समजले नाही."     मी कपडे चेंज करून, ओले कपडे तिथेच एका दांडीवर वाळत टाकत तडक अंगणामध्ये आले.

"अगं, शाळेची जमीन एका जमीनदाराची होती. त्यांना पैश्याची अडचण होती म्हणून ती जागा त्यांनी विकली. मग शाळेच काय करायचं ? हा प्रश्न उभा राहीला.  बंदच करायची वेळ आली होती पण योगायोग बघ... एका सद्गृहस्थाने तीच जागा विकत घेतली आणि परत शाळेच्या नावे सुपूर्द केली. माझ्या आग्रहावरून ते भेटायला येत आहेत  इथे."  नेहमीप्रमाणे समोर पेपरमध्ये डोकं घालून आबा सकाळच्या बातम्या संध्याकाळी वाचत होते. 

"आबा एवढी मोठी गोष्ट तुम्ही याआधी मला केव्हाच सांगितली नाही. " 

" शाळेच्या काही गोष्टी खाजगीत ठेवाव्या लागतात. त्यात वयोमानानुसार मी ही आजकाल खूप काही विसरत चाललोय ग. तुझे आबा म्हातारे झाले आता. "

म्हणत आबा त्यांच्या जाडजूड चष्म्याच्या काड्या वरती करत हसले.

एवढ्यात ते नवीन चेअरमन येऊन बसले, तिथे अंगणातच असलेल्या  झोपाळ्यावर त्यांच्या आणि आबांच्या गप्पा-ठप्पा रंगल्या देखील. त्याआधीच मी "बरं बरं. चहा घेऊन येते." म्हणत आतमध्ये स्वयंपाकघराकडे वळले होते.

" मनू। चहा? "

आबांच्या आवाजासरशी मी चहाचा ट्रे घेऊन अंगणात आले. चहा ठेवून बसणारच एवढ्यात आबांनी आमची ओळख करून दिली,

"हे 'मिस्टर तांबे' नवीन चेअरमन आणि ही माझी मुलगी मनस्विनी. त्याच शाळेत शिक्षिका आहे. "

 'मी नमस्कार म्हणण्यासाठी हात जोडून वरती पाहिले, पण मला काही म्हणण्याची हिम्मत झालीच नाही. नुसतेच हात जोडून मी मिनिटभर आवासून बघतच राहिले.  हे  'मिस्टर तांबे'? एक जुनी ओळख होती. त्याची, एका पावसाची आणि माझी... पुढचे काही आठवण्याची हिम्मत माझ्यामध्ये आत्ता उरलीच नाही.  मान खाली घालून मी नुसती बसून राहिले. कारण त्याच्याही नजरेत ओळखीची झलक होती. जुनी ओळख. वर्षानुवर्षांची...

मला उशीर होतोय आणि आभाळ भरून आलंय त्यामुळे पाऊस येण्याचे चिन्ह ही दिसत आहे. निघतो मी. पुन्हा केव्हातरी भेटू. "   म्हणत ते उठलेही. एवढ्यात आत माजघरात असलेल्या जुन्या टेलिफोनची रिंग वाजत होती.

"एक महत्वाचा फोन येणार होता. तोच असेल बहुदा. मलाच जाऊन पाहावं लागेल." म्हणत आबा ही त्यांचा निरोप घेऊन आत वळले.

जाताना, "मनू पाहुण्यांना गेटपर्यंत सोडून ये. "  अशी आज्ञा करून गेले.

मी एकही शब्द न बोलता बाजूची एक छत्री घेऊन त्यांच्यासोबत गेटपर्यंत आले, गेटजवळ एक जुनी जिप्सी कार उभी होती. येतो म्हणत ते दरवाजा उघडणारच तेवढ्यात अचानक पावसाला सुरुवात झाली होती.

"पाऊस आहे, जा तुम्ही. मी निघतो."    म्हणत त्यांनी माझ्याकडे पाहिलं.

"होय. पहिला पाऊस आहे."    उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलून गेले.

"पहिला नाही. कपाशीचा पाऊस...बराबर ना?"    म्हणत त्यांनी परत माझ्याकडे पाहिलं आणि मी अगदी निःशब्ध झाले.

"राजन."   एवढा एकच शब्द माझ्या तोंडून निघाला. छत्री सावरत मी मागे वळणार तोच जोराची वीज चमकली, बेभान वार्याने माझी छत्री उलटी केली होती. तिला सावरण्याची धडपड करत मी जागीच खिळले.

"अजून विजेला घाबरतेस? "    म्हणत त्याने माझ्या हाताची छत्री स्वतःचा हातात घेत तिला सरळ केले. परत बंद करून माझ्या हातात देत पुढे म्हणाला,

"आज परत एकदा भिजवास वाटतंय, अगदी त्या दिवशी सारखं, ना विजेची भीती ना वार्याचे भय, उनाड लहान मुलाच मन घेऊन, सैरभैर धावत सुटावं... रानोमाळी. ते ही तुझ्यासोबतीने."

"का आलास परत?"   मी रागारागाने प्रश्न केला.

"यावंच लागलं.  माहित होत मला, कोणीतरी वाट पहाताय माझी आणि नाही नाही म्हंटल तरी त्या कपाशीच्या पावसाचीही. "

त्याच्या उत्तराने माझा राग कुठल्या कुठे पळाला होता. त्याचा हात हातात घेत मी भरल्या आभाळाकडे पाहिले.

'खरच भिजायचं. अगदी त्या दिवशी सारखं, लहान मुलं होऊन."

त्यानेही मानेने होकार भरला.आणि तसेच आम्ही निघालो... त्या कपाशीच्या पावसाचा आनंद घेत. ना विजेची भीती ना वार्याचे भय.

दोन पावलं चालताच तो मध्येच थांबला. मी मानेने काय झालं म्हणून विचारताच म्हणाला,

"मनू. आज परत तेव्हासारखं कुणी पाहिलं तर? काय म्हणतील लोक? "

मी ही दोन मिनिट स्तब्ध झाले, मग हसून त्याला म्हणाले,

"आता तुला कोणीही शाळेतून हाकलून देऊ शकत नाही. कारण आता  शाळाच मुळी तुझी आहे. आणि...आणि..."

"होय. तेव्हा शाळेतून काढलं नसत तर, तो राजू आता मिस्टर राजन तांबे झाला नसता. तुझ्या आबांचे आभारच मानायला पाहिजेत."  म्हणत तो ही हसला.

"होय. पण आबांनी तुला ओळखलं कस नाही?''  मी माझ्या मनातलं आश्चर्य व्यक्त केलं.

तो अजूनच मोठ्याने हसून म्हणाला,

"ओळखल्याशिवाय तो महत्वाचा फोन घ्यायला ते गेले का? त्यांनी केव्हाच ओळखलं मला. तस बोलूनही दाखवलं. त्यावेळेसही ते माझ्यासाठी उभे होते. पण शाळेच्या नियमांपुढे कुणाचे काही चालले नाही."

"म्हणजे आबांनी त्यासाठी मला तुला गेटपर्यंत सोडायला सांगितलं तर? "   माझा अजूनही विश्वास बसत नव्हता.

"होय. चल... पुन्हा एकदा शाळेत जाऊ."  

आम्ही दोघेही शाळेच्या दिशेने निघालो.  आज कपाशीच्या पावसाची मला भीती नाही, किवा कोणीतरी पाहिलं त्याची लाज ही नाही. आज कोणी विचारलं तर, अगदी गौरीने जेवढ्या निर्भीडपणे गणेशाची साथ दिली, तेवढ्याच हिमतीने ओरडून-ओरडून सांगेन त्यांना,

 ' होय। आवडतो मला तो, आणि त्यालाही मी आवडते, आणि आम्हाला दोघांना आवडतो हा बरसणारा कपाशीचा पाऊस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...