सोमवार, २४ जून, २०१९

अळूची पातळ भाजी/फदफदं/फतफत आणि एक कथा

अळूची पातळ भाजी हे नाव बहुतेक सगळ्यांना माहीत आहे, मात्र अळु भाजीच्या बुळबुळीतपणा या गुणधर्मावरुन अळूचं फदफदं हे नाव ठेवल गेल आहे.

अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात.
तर अळू वडी साठी थोडी जाडसर अन् गडद हिरवी, वरती मोठ्या गडद शिरा असणारी पाने वापरली जातात.
हा या दोघांमधील फरक आहे.

अळूपासुन शरीरास मिळणारे फायदे:-
अळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.
रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी या साठीही अळू भाजी उपयोगी ठरते.

मामाच्या गावी गेल्यावर केव्हा-केव्हा हा अळूच्या फदफद्याचा बेत अजुनही होतो, आणि आजीचा  "भात भाकरी आहे हो खुप. आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका" असा टोला पण असतोच. आजी अस का म्हणते ग नेहमी? अस विचारताच आजी तिचीच नेहमीचीच/पुर्वापार चालत आलेली कथा रंगवून सांगत असते. मला तिच ती कथा परत-परत ऐकायला आवडत. विषय अळुचा आहे म्हणुन ती कथा मी इथे टाकत आहे.

तर कथा अशी आहे.... एक नव विवाहीत जावई बायको सोबत तिच्या माहेरी जेवणासाठी आलेला असतो, घरी अठरावीष्व दारिद्र्य, धान्य नाही, जावयाचा पाहुणचार कसा करावा ? हा सासुबाईंना पडलेला प्रश्न. मनाशी काही तरी ठरवुन त्या गाठीशी असलेले पेलाभर तांदुळ शीजत घालतात. परसातील कोवळी अळुची पाने काढुन भरपुर प्रमानात अळूचं फदफदं बनवतात. जावई जेवायला बसल्यावर पापड-कुर्ड्या, भात आणि फदफदं असा बेत पानामध्ये वाढला जातो. जावईबुवा भातावरती  यथेच्छ पसरवलेल फदफदं समपवुन "वा छान झाल आहे फदफदं" अस म्हणत खाली असणार्या भाताला हात लावणार तेवढ्यात सासुबाई " आवडल ना मग  घ्या अजुन लाजू नका" अस म्हणत वरती प्रेमानेच(?) अजुन फदफदं वाढत.
आता फदफदं खावुन तृप्त (?) झालेला जावईबुवा पानात लावलेला भात कसाबसा संपवुन सासुरवाडीचा प्रेमभावे निरोप घेतो. वरती अजुन फदफदं वाढत असताना सासुबाईच्या तोंडुन सारख बाहेर पडणार एक वाक्य मात्र तो कायमचच लक्षात ठेवतो "भात भाकरी आहे हो खुप. आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका"
आजीची कथा संपली की आम्ही  पोट धरुन हसतो, आणि तितकच वाईट ही वाटत.
 तर "अळूची पातळ भाजी,अळूचं फदफदं किवा अळूचं फतफत " काहीही म्हणा याची मी करत असलेली पाककृती मी इथे पोस्ट करत आहे.

साहित्य: 
अळूची पाने ५-६
शेंगदाणे व चणा डाळ दोन्ही छोटी अर्धी वाटी.

फोडणीसाठी साहित्य: 
तेल ४ टेबल स्पून ,१  छोटा चमचा मोहोरी ,हिंग चविनुसार (ऐच्छिक), १/२ चमचा हळद व तितकाच गरम मसाला , १ चमचा लाल तिखट,अर्धा कादा आणि  टोमटो(ऐच्छिक), लसुन २-३ पाकळी, मिठ चविनुसार, १ चिंच किवा कोकमाची साल, १ तमालपत्र (ऐच्छिक), 2-4 मेथ्याचे दाणे (ऐच्छिक).
गोडा मसाला २  मोठे चमचे. (गोडा मसाला पाककृती लवकरच )

कृती:
शेंगदाणे/चणा डाळ ४ तास पाण्यात भिजत ठेवावा, अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठं वरिल पातळ आवरन काढुन घ्यावे. नंतर पानं व देठंही बारीक चिरून घ्यावे. हे सर्व प्रेशर कुकरमध्ये पाहीजे तेवढे पाणी घालुन १ शिट्टी करून शिजवून घ्यावे.(नंतर फोडणीमध्ये  वरुन पाणी घालु नये)


कढईत तेल गरम करून फोडणीसाठी साहित्याच्या दिलेल्या क्रमनुसार फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे. वरुन भुरभुरायला आवडत असेल तर थोडस ओल खोबर घालु शकता.

गावठी तांदळाचा भात किवा भाकरी बरोबर खायला घ्या, पावसाळ्यात एक मस्त बेत होउन जाईल.


 टिप:
१)  अळूत ऑक्झॅलिक अ‍ॅसिड असल्यामुळे खाताना घशाला खाज सुटते, त्यासाठी चिंच, कोकम किवा आमसूल घालावा लागतो.
अळू चिरताना हातालाही खाज सुटते, त्यासाठी हाताला चिंचेचा कोळ लावून, अथवा साधे प्लास्टिकचे ग्लोज घालुन ते चिरावं लागत.
२)  अळूच्या देठा पासुन देठी हा रुचकर पदार्थ ही बनवता येतो.
३) शिजवून घेतलेला अळु  मिक्सर करुन किवा मस्त पैकी घाटुन घेतला की भाजी मिळुन येते.   

सोमवार, १० जून, २०१९

अशीच काही मनामध्ये गुंतलेली गाणी...१) आयेगा आनेवाला...


टण.....टण..... मंदिरातील मोठ्याल्या घंटेला एकदाच टोला दिल्यावर घुमतो तो आवाज.
दुरदर्शन असाव तेव्हा. बाबा hall मध्ये t.v. बघत होते. मी बाजुलाच झोपलेले. मला अजुनही आठवतय. दोन टोले कानावर पडले तेव्हा मी तडक उठुनच बसले होते. घाबरून थोडं बाबांकडे सरकत माझा पहिलाच प्रश्न होता.
" बाबा हा एकटाच आहे ?
बाबांचं उत्तर होत: नाही दोघे आहेत. पण तो ही एकटाच आणि ती ही एकटीच!
मी: कस काय बाबा ? (मला म्हणायच होत या चित्रपटामध्ये अजुन कोण-कोण आहे.)
बाबांचं उत्तर: असच असत आयुष्यात. हा दुनियादारिचा गोतावळा फक्त नावालाच....बाकी आपण सगळे एकटेच येतो आणि एकटेच जातो."
(चित्रपट बघताना काही प्रश्न विचारला की बाबा असच काही-बाही बोलायचे....तेव्हा मला वाटायच त्यांना डिस्टर्ब होत असाव. पण त्याच्या बोलण्याचा खरा अर्थ समजण्यासाठी मला पुढे काही वर्ष मोजावी लागली. आणि वयानुसार त्याची उकलही झाली.) तेव्हा मात्र जास्त प्रश्न नको म्हणुन मी t.v. कडे मान वळवली होती.
बॉम्बें टॉकीजचा चित्रपट- महल.
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला आणि अशोक कुमार हि जोडी.
गीत-आयेगा आनेवाला...
गायिका लता दीदी ' दीदी ते भारताची गाण कोकीळा' या पर्वाच्या प्रवासाची सुरुवात होती ती कारण या गाण्यानंतर लता दीदींना चांगली प्रसिद्धी मिळाली असं म्हणतात. गाण्यात प्रतिध्वनी निर्माण करण्यासाठी या गाण्याचे ध्वनीमुद्रण एका बंद खोलीत करण्यात आलं. दोन भाग आहेत पहिला script demand म्हणुन दुसरा मुखडा. पहिला भाग हा माईक पासुन थोड दुर फिरत-फिरत गायला गेला आहे. आणि याचे effects काय अफलातुन आहेत हे गाण ऐकताना क्षणो-क्षणी जाणवत. रिमिक्स, पॉप  सॉग्सं च्या जमान्यात आज हे गाणं मनात घर करून बसलं आहे. भारतीय सिनेसृष्टीच्या मुकूटातील सुरुवातीच्या काळात खोवल गेलेल एक अढळ मोरपिस जणू.
खेमचन्द प्रकाश यांच गूढगम्य म्युझिक. विणा,पेटी,झांज,तंबोरा,तबला,व्हायोलिन काय अन कोणती-कोणती वाद्य वापरली आहेत या गाण्यात माहीत नाही. पण गाण ऐकताना ह्र्दयात असंख्य विणेच्या तारा झंकारतात. मनाच्या कोपर्यात  कुठे तरी भावनांची पेटी वादन चालु होत, ह्र्दयाचे ठोके अन तंबोऱ्याचा टणकार यातला फरकच जाणवेनासा होतो. दुर्दम्य आशावाद आणि प्रबळ इच्छाशक्ती यांचा अप्रतिम देखावा.
टण..... टण.... तेच ते दोन टोले....हा गजर आहे घडाळ्याचा. अन बजर आहे विश्वासाचा. काळोखाच्या रांगोळीने श्रुंगारलेला भव्यदीव्य महल, लपत-छपत दिसणारा सावल्यांचा खेळ करत ढळणारी रात्र, बेसहारा नावेप्रमाने पण वारा नसतानाही हेलकावे घेणारे झुंबरं, एकटाच नायक, आणि आर्त टोले देणारी २ ची घटीका, काळोखाला घाबरणारा देखील रात्रीच्या प्रेमात पडेल असा कृष्णधवल देखावा (कृष्णधवल या शब्दाचा खरा अर्थ मला इथे उमगला) आणि जन्म घेते एक विश्वासक आळवणी.
"खामोश है ज़माना, चुप-चुप हैं सितारे
आराम से है दुनिया, बेकल है दिल के मारे
ऐसे में कोई आहट, इस तरह आ रही है
जैसे कि चल रहा है, मन में कोई हमारे
या दिल धड़क रहा है, इक आस के सहारे"
मिट्ट काळोखात एक मिनमीनती मेणबत्ती घेऊन विश्वासाने उजेडाला आमंत्रण देणारी कामिनी. तिच्या प्रेमाच्या शोधात फिरत असते. काहीही झालं तरी कामिनीचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे, खात्री आहे. तिचा प्रियकर तिला नक्की भेटायला येईल असा दृढ विश्वास तिला आहे. अंधार्या रात्री गर्द दाटलेल निराशेच सावट,सारच शांत,निस्तेज,निष्क्रिय. पण एवढ्या निराशेमध्ये देखील जन्म घेते एक विश्वासक साद...."आएगा, आएगा, आएगा, आएगा आनेवाला, आएगा आनेवाला. "
"दीपक बग़ैर कैसे, परवाने जल रहे हैं 
कोई नहीं चलाता, और तीर चल रहे हैं
तड़पेगा कोई कब तक, बे-आस बे-सहारे 
लेकिन ये कह रहे हैं, दिल के मेरे इशारे"
सारच गुढ, कल्पने पलीकडुन आलेल आणि कधिही न पाहीलेल. झुल्यावर बसुन झुलणारी नायिका, अजुनही अंधाराच्या दिशेने चाचपडत चालणारा नायक आणि रिकामा झुला पाहुन हिरमोड झालेली त्याची पाठमोरी छबी. तरी देखील तिच विश्वासक साद...."आएगा, आएगा, आएगा, आएगा आनेवाला, आएगा आनेवाला."
"भटकी हुई जवानी, मँज़िल को ढूँढती है 
माझी बग़ैर नय्या, साहिल को ढूँढती है
क्या जाने दिल की कश्ती, कब तक लगे किनारे
लेकिन ये कह रहे हैं, दिल के मेरे इशारे"
आधीच भटकता प्रवास तरीही मँज़िल शोधताना..... झाडांच्या मधोमध अडखळलेली ती नायकाची गंभीर पण शोधक नजर.
माझी बग़ैर साहिल शोधताना, किणारा कधी मिळेल याची काहीच कल्पना नाही, पण तरीही अदृश्य होत असणार्या नावेतून येणारा तोच आश्वासक इशारा...."आएगा, आएगा, आएगा, आएगा आनेवाला, आएगा आनेवाला."
...........................................................................
"महल संपला तेव्हा बाबांना म्हणाले होते, " बाबा पुन्हा केव्हा हा चित्रपट लागला तर सांगा, मला पहिल्या पासुन बघायला आवडेल. बाबाही हो म्हणाले होते." पण परत कधीही महल लागण्याच्या आतच बाबा आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघुन गेले, परत कधीही न येण्यासाठी. साल २००५,मे महीना,आणि आएगा आनेवाला या गाण्यापासुन पुढचा सगळा महल चित्रपट चांगला लक्षात राहीला. परत कधीही न विसण्यासाठी.
म्हणतात की अपुर्ण काही ठेवु नये, पण काही गोष्टी या अपुर्णच एवढ्या परिपुर्ण असतात की त्याना पुर्णत्वाच्या मोहोरेची गरज नसते. बाबांबरोबर हा चित्रपट पाहीला, पहील्यांदाच अन शेवटचा. त्यानंतर बघायला धीरच होत नाही. आजही तो माझ्यासाठी अपुर्ण असुनही परिपुर्ण आहे बाबांच्या आयुष्यासारखाच.

( बाबा आणि मी -एक आठवण )

शुक्रवार, ३१ मे, २०१९

जमतच नाही कविता करणं




नाही कविता करणं
जस जमतच नाही आठवणी विसरण.
माते कडून पान्ह्याची
गुरु कडून ज्ञानाची
विधात्या कडून प्राणाची..
अन विंदांच्या गाण्याची....
अशी गुंफण केली दानाची
पण जमेनाच ते फेर धरन....
त्याच्या कडून चांगुलपणाची
तुझ्या कडून हळवेपणाची
तिच्या कडून सौंदर्याची
अन कृतज्ञतेच्या जाणिवांची
अशी गुंफण केली भावनांची
पण जमेनाच ते फेर धरन.
कल्पने कडून शब्दांची
स्मृतीं कडून भावनांची
तिमिरा कडून सरन्याची
अन उष:कालाच्या किरणांची
अशी गुंफण केली प्रारब्धाची
पण जमेनाच ते फेर धरन.
पानावर पड्ले शब्द शब्दची
सारेच बिघडले-अडखळले,
अनं चडफडले मी.
पुढे पंक्तिच सुचेना काव्याची
तरिही गुंफण केली रचनांची
का बर जमेनाच ते फेर धरन ?
( विता करनं जमत नाही तरीही ही कविता पुर्णपणे माझीच आहे याची क्रुपया नोंद घावी.
पहिलीच कविता त्यामुळे अपेक्षित बदल नक्की सुचवा. )

बुधवार, २९ मे, २०१९

अंडा बिर्याणी- (उकडुन तुकडे केलेल्या अंडयाची बिर्याणी )

 सकाळ व्रुत्त सेवा yen buzz  मध्ये प्रकाशित.
http://www.yinbuzz.com/egg-biryani-10287

   अख्या अंडयाची बिर्याणी आपण करतोच....ही थोडी वेगळी अंडयाचे तुकडे करून केलेली बिर्याणी आहे. अख्ख अंड घालुन बिर्याणी होते पण तो अंडयाच flavor अजीबात येत नाही म्हणुन मी अशी बिर्याणी try केली....
एकदा तरी करून बघा....आवडेलच.
वाढणी/प्रमाण:
२-३
लागणारा वेळ:
३० मिनिटे
साहित्य
1) भातासाठी साहित्य-
बासमती तांदुळ 2 वाटी, 2 लवंगा, 2 मिरी दाणे, 1 मोठी मसाला वेलची, 1 पूर्ण भरलेला टी स्पून मीठ, 1 टेबल स्पून तेल.

IMG_20190417_204712_HDR.jpg
2) अंडा-मिश्रण साहित्य -
2 टेबल स्पून तेल,कांदे- 2 बारीक चिरून घ्या, आल्ले लसूण पेस्ट 1 टेबल स्पून, 2 हिरवी वेलची, 2 दालचिनी, 2 काळी मिरीचे दाणे, हळद 1/2 टी स्पून, लाल मिरची पावडर 2 टी स्पून, जीरे पावडर व धणे पावडर दोन्ही 1 टी स्पून, 1 टी स्पून मीठ,
टोमॅटो- 2 स्लाईस करून . 4 अंडी उकडुन, १ चे ४ तुकडे करून घ्या
3) ईतर साहीत्य-
पुदिना 1/2 वाटी,कोथिंबीर 1 वाटी बारीक चिरून घ्या,
कांदा 2 पातळ स्लाईस करून तेलात सोनेरी तांबूस तळुन घ्या,
चिमटित मावेल एवढाच गरम मसाला पावडर.
क्रमवार पाककृती:
भातासाठी कृती -
वरील सर्व साहीत्य कुकर मध्ये एकत्र करावे, 2 मिनिट कुकर मध्ये मद गास वरती चांगले परतावे (याने तांदुळ चागला मोकळा आणि सडसडीत होतो). तांदुळ थोडा कमीच शिजायला हवा म्हणुन यात 3 वाटी पाणी घालून २ च शिट्ट्या करा, नतर थड करयला ठेवा.

IMG_20190417_203501_HDR.jpg
अंडा-मिश्रण कृती-
खोलगट कडईमध्ये तेल गरम करा, ( अंडा-मिश्रण साहित्य मधील सर्व प्रमाण) यात कांदा व आल्ले लसूण पेस्ट घालून एक मिनिटांसाठी मंद आचेवर परतावे. त्यानंतर 2 हिरवी वेलची,2 दालचिनी,2 काळी मिरीचे दाणे, हळद, लाल मिरची पावडर, जीरे पावडर, धणे पावडर, थोडे पाणी घालून सर्व एकत्र पुन्हा चांगले परतावे. स्लाईस केलेले टोमॅटो घालून तेल वेगळे व्हायला सुरुवात होईपर्यंत शिजवावे. मीठ घालून झाकन घाला, आता उकडलेली अंडी काळजीपूर्वक घालून न धवलता मिश्रण बाजूला ठेवा.

IMG_20190417_212549_HDR1.jpg
आता कुकर मध्ये थर रचावेत, एक लहान जाड तळ असणारे गोल शिजवण्याचे भांडे सुदधा वापरू शकता .
त्यावर 1-२ टी स्पून तूप पसरावे, त्यानंतर पहिला थर भाताचा घालावा, अंडा-मिश्रणचा एक थर अगदी प्रेमाने पसरावा, तुकडे केलेली अंडी जास्त फुटु नयेत म्हणुनच, हिरवी कोथिंबीर, पुदिन्याची पाने, गरम मसाला पावडर टाकावी, कांदा (सोनेरी तांबूस तळुलेला) घाला, त्यानंतर अजुन एक भाताचा थर घालावा. या प्रमाने आपण एक एक थर घालु शकतो, क्रम एछीक आहे. पहिल्यांदा डीश अल्यूमीनियम फाइलने सील करावी, मंद आचेवर हा कुकर एका जाड पॅन वरती ठेवा. 10 मिनिटे शिजवा. (शिटी करायची नाहीय. झांकण ठेवावे, अथवा कुकर असेल तर कुकरच्या झाकणावरची शिटी काढून टाका)
अंडा बिर्याणी खायला तयार आहे.
IMG_20190417_212545_HDR.jpg
मी सेम रेसिपी मध्ये अंड्या एवजी १/४ कि बोनलेस चिकन तुकडे दही, हळद,मीठ मारीनेशन करून चागल शिजवुन घालते , आल्ले लसूण पेस्ट मात्र् २ टेबल स्पून घालते, आणि ३-४ टि स्पून लाल मिरची पावडर आणि थोडा चिकन बिर्याणी मसाला घालुन बिर्याणी बनवते. बाकी सर्व सेम, झक्कास चिकन बिर्याणी होते.
टीप-
1) थोड्या दुधात २ काडी केशर घोळुन या थरावर मधे- मधे घालु शकता,याने चागला कलर येतो.
2) कोथिंबीर, पुदिन्याची पाने या बरोबर मणुके, तळलेले काजू ई घालु शकता मस्त टेस्ट येते.
3) गरम मसालया एवजी थोडा चिकन बिर्याणी मसाला घालुन हिच रेसिपी अजुन रूचकर करता येईल.
4) सर्व करताना त्या बरोबर लिंबु घेऊ शकता.
माहितीचा स्रोत:
ही माझी स्व:तची पद्धत आहे....अजून बऱ्याच वेगवेगळ्या पदधती असु शकतात.

श्रीखंड - पाककला

सकाळ व्रुत्त सेवा yen buzz  मध्ये प्रकाशित.

घरगुती आणि ताजे श्रीखंड-
साहित्य:
ताजे दही - 1 किलो,
पिठी साखर -1 किलो
गोड कमी हवे असेल तर पाऊण किलो साखर ,
केशर ४ काडी,
वेलची पूड -अर्धा चमचा,
थोडी जायफळ पूड - अर्धा चमचा,
चारोळी १०-१२ दाणे,
ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे पण मी काजू, बदाम घेते ते ही पातळ काप करून.

कृती: ताजे दही पातळ कापडात बांधून वरती लटकवावे (८ ते १० तास) एक रात्र.
पूर्ण पणे पाणी निघाल्यावर एक पातेल्यात काढावे. त्यात साखर मिसळावी.
नंतर मिश्रण (चक्का) फेटून घ्या (खूप वेळ लागतो हे मिश्रण चांगले एकजीव व्हायला)
किंवा पुरण पात्रा मध्ये किंवा चाळणीवर फिरवूनही श्रीखंड तयार करता येते.
तयार मिश्रणात केशर घोळून मिसळावा.
आता यात वेलची, जायफळ पूड घालून ढवळावे नंतर ड्रायफ्रूट्स काप पसरावेत. श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून गार होऊ द्यावे.
श्रीखंड तयार आहे.
टीप -
* मी गोड जरा जास्त खाते आणि श्रीखंड हा तर माझा all time favourite पदार्थ त्यामुळे मी १ कीलो दही लावून १ कीलो पिठी साखर वापरते पण तुम्ही मात्र साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
* आणि same recipe मध्ये २-३ वाटी आमरस घालून सुद्धा करून बघा. (आम्रखंड)
अर्थात ही माझी पद्धत आहे.
कोणी जर अजुन वेगळ्या प्रकारे झटपट श्रीखंड तयार करत असाल तर please share करा.

आठवणीतील चिमणी

आज रविवार. सकाळ पासूनच धमाल नुसती. आम्ही मुलं परसात खेळत होतो. लपाछपी चा खेळ म्हणुन मी एका आंब्याच्या झाडामागे लपलेले. एवढ्यात बाजूलाच असलेल्या सुक्या पानांच्या ढिगामध्ये काही तरी पडल्याचा आवाज झाला. पण बाहेर पडले तर पकडले जाईन म्हणून मी तिथुनच निरिक्षण करायला लागले.काहीच दिसेना.
थोड्याच वेळात चि....चि.....असा काहीसा आवाज झाला तिथे आणि मी ओरडत त्या दिशेने धावतच सुटले.
आई गं ! ते इवलेस चिमणीच पिल्लू, कुणी बरं त्याची पिस ओरबाडली असतील? पिसातुन रक्त येत होत, थोडी स्कीन पण निघाली होती. धड उडता पण येत नसाव. त्याला तसंच हातात घेऊन काहीही विचार न करता मी पळत सुटले ते थेट घरीच.
'आईईईई हे बघ ना, ये ना इकडे लवकर, काय झालं गं याला बघ ना'
आईने थोडं पाणी चमच्याने त्याच्या चोचीत घातल पण सगळंच बाहेर आलं आणि त्या पिल्लाने शेवटचा श्वास घेतला.
चिमणी म्हणजे काय वाटतं माला, काय सांगू ! माझा अगदी जीव की प्राण आणि त्या पिल्लाने तर माझ्या हातावरतीच प्राण सोडला होता.
दिवसभर खुप रडले, जेवले सुद्धा नाही. 'मला एक पिल्लू आणुन दे आत्ताच्या आत्ता' माझा पाढा चालूच. बाबानी खुपदा समजावून झाल पण काहीच उपयोग झाला नाही. लहान होते तेवढी अक्कल कुठून असणार! आजी माझ्या जवळ आली, मी तिचं ऐकायची ना म्हणून.
आजी- ' बाळ असं नको ते हट्ट करू नये, तु आता मोठी झाली की नाही आणि बघ ....... ..
तिचं वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच माझी धुसफूस सुरू ' तु... तु ....ना गपच बस आज्जे, ते काल एक पिल्लू मिळालं होतं ना ? मग ते का सोडून दिलस ???
कोकणातल कोलारु घर कालच एक पिल्लू घरात सापडलं होतं, आणि आजी ने ते बाहेर झाडावर सोडून दिल होत. ते माझ्या लक्षात आलं.
मी परत चालू- 'आज्जे तु मला आत्ताच्या आत्ता दुसर पिल्लू आणुन दे, आत्ता च्या आत्ता'.
उन्हाळ्याचे दिवस होते. आई स्वयंपाक घरात आंब्याच पन्हं करत होती. ऐकुन ऐकुन घेऊन सरळ बाहेर आली. माझ्या बघोटिला धरून त्याच हाताने माझ्या एक कानाखाली वाजवली. मी नुसती लाल झाले, गंगा जमुना ना आणखीनच पुर् आला.
आई चालू - ' चुप बस, एकदम चुप, मघा पासुन ऐकुन घेते , आजी ला उलट सुलट बोलते, काय वेड आहे या मुलीला, मारायचे आहे का त्या चिमण्या ना ???
चिमणी हवीय म्हणे, काल आजी ने बाहेर झाडावर सोडूली ना तिचं हि चिमणी आज मेली ती. पक्षाचे सुद्धा काही नियम असतात, माणसांचा हात एखाद्या पक्षाला लागला ना मग इतर पक्षी त्याला स्विकारत नाहीत,चोचीने टोचुन मारतात.आपल्या हाताचा वास येतो त्या पक्षाला म्हणून कदाचित.
एक दिवस शाळेला सुटी असेल तर तुम्ही मुलं सकाळ पासूनच बाहेर उंदडत असता ना??
तुला कोणी पकडुन ठेवल तर चालेल का???
आई खुप ओरडली, तरीही मी मात्र अर्धा-निम्मा दिवस पायात डोक खुपसून रडतच होती.
चिमणी हवीय म्हणून.
खुप वर्ष झाली आता, गावी कौलारू घर जाऊन स्ल्याप, प्लास्टर ची छोटेखानी इमारत आहे, आजी पण देवाघरी गेली, चिमणी दिसणं पण तुरळकच, गावी गेलेच तर माझ चिमणी पुराण आईकडून एकदा तरी दोहरल जातच. मी ही चालुच ठेवलंय माझं चिमणी प्रेम.

IMG_20181005_081435_HDR.jpg

माझ्या बाल्कनीतला हा फोटो, गेले काही महिने हि बाई स्वेच्छेने येऊन बसते रोज. घान करते म्हणून माझ्या शिवाय घरी फारसं कोणाला तीच येण आवडत नाही. पण मला याचा काही फरक पडत नाही आणि तिला ही.

एखाद्या पक्षाला फक्त माणसाचा हात लागला म्हणून बाकीचे पक्षी टोचुन मारतात. (आईच्या म्हणण्यानुसार, तिचा समजही असेल,खरं खोटं ते पक्षीच जाणोत) (कदाचित पंजी, आजी,आई पिढ्यांन पिढ्यांची समजुत असावी, कारण आई ला हे तिच्या आईने सांगितले असं ती म्हणते! असो यावर आपलं मत जाणून घ्यायला आवडेल.)
पण हे खरं असेल तर मग माझ्या मनात एक प्रश्न नेहमी टोचत राहतो! माणसं एवढी चुकतात, भरकटतात, अक्षम्य गुन्हे सुद्धा करतात, तरीही हा समाज आणि आपण त्यांचा स्विकार करतोच ना?
'मग आपण ज्यांना अज्ञानी समजतो त्या पक्षाचा न्याय मोठा की स्वतःला सर्वज्ञानी समजणाऱ्या माणसांचा'???

मोगरा..

मोगरा... नावातचं सुहास, शितलता आणि प्रसन्नता जाणवते.
फक्त मोगरा अस मनातचं म्हणा...कसा कोण जाणे त्याचा वास आजु-बाजुला जणवायला लागतो. (माझ्या बाबतीत तरी असच होत बर्याच वेळेस)
मन त्याच्या आठवणीच गुलाम आहे, नसताना ही त्याच अस्तित्व जाणवत. तो सुगंध मना-मनात भरलाय .
नुसत डहाळि अन डहाळि भरुन यायचं, उमलन तेही शुभ्र धवल, दुसर्या रंगाचा नावालाही स्पर्श नाही .
जणु तयाचा रंगच न्यारा.
हिरव्या गर्द साडितील शुभ्र कांतिमय कन्या जणु, पण उमलताना येणार आपल्या सख्यांचा गोतावळा घेऊनच, मोगर्‍याला एकट- दुकट वेलीवर कधी पाहिल्याच आठवत नाही मला. कळ्यांचे घोस च्या घोस दिसतात. मस्त दिमाखदार, पण सौंदर्यचा जराही अभिमान नाही. उलट शितल, सज्जन, आणि खाणदानीपनाची झाक घेउनच याचा जन्म होतो, आणि आपल्या सुहासाने सारा आसमंत व्यापुन टाकत .

लता दिदीच हे आजरामर गाण म्हणजे मोगर्‍याच्या सौंदर्यच अचुक वर्णन आहे .


इवलेंसे रोप लावियलें द्वारी
इवलेंसे रोप लावियलें द्वारी
तयाचा वेलु गेला गगनावेरी ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला
मोगरा फुलला ।। मोगरा फुलला।।
            तर असा हा मोगरा...
मोगऱ्याची एक पोस्ट वाचल्यापासून काही लिहावंसं वाटत होतं. वेळेअभावी जमत नव्हतं. Finally आजचा मुहूर्त मिळालाय.
मी खुप कमी नाटक बघते, कारण खुप वेळ लागतो ना नाटक करायलाही आणि बघायलाही.
त्यातीलच एक काही वर्षांपूर्वी दिलीप प्रभावळकरांचं "वाह गुरू" नाटक पाहिलेलं. त्यात स्वतःचं मरण समजलेले एक प्रोफेसर आणि त्यांची बायको मिळून एक समारंभ ठरवतात ज्यात त्यांचे आप्त, विद्यार्थी, मित्रपरिवार असे सगळे जमा होतात. कार्यक्रम छान आनंदात पार पडतो. समारोपाला सर सगळ्यांना ती बातमी सांगतात, स्वतःचं मरणा बद्दल. "कि आपल्याला स्वतःचं मरण केव्हा हे समजलेल आहे

आणि अमुक अमुक या दिवशी मी मरणार." मग स्वतःच्या 3 शेवटच्या इच्छा ही सांगतात. हे सारं ऐकून काहीजण हळहळतात. प्रोफेसर खुप चांगले सज्जन ग्रुहस्थ असतात . भावना विवष होऊन काहीजण तर रडूच लागतात.


तेव्हाचं त्यांचं एक वाक्य, "ईश्वराने मला थोडी तरी कल्पना दिली आहे की माझ्या हातात किती दिवस आहेत जगण्याचे, ते सत्कारणी आणि आनंदी घालवावे की कमी दिवस आहेत म्हणून रडत बसावे?"


दोनदा पाहिलं हे नाटक....जाम रुजलंय खोलवर मनात कुठेतरी. वाटतं खरंच आपण आपली शेवटची इच्छा कुठेतरी लिहून ठेवायला हवी किंवा कुणाला तरी सांगून ठेवायला हवी.जो दिवस मिळतो तो भरभरून जगायला आवडतं.इतर कोणत्या इच्छा पूर्णत्वास जातील की नाही माहीत नाहीत. पण एक हमखास इकडे तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटत आहे. (प्रज्ञा... same तुझ्यासारखीच आहे इच्छा)


ती म्हणजे ओंजळभर का होईना मोगऱ्याची फुलं माझ्या आजूबाजूला पसरवून ठेवा.

हा प्रवास कसा चाललाय माहीत नाही.
कित्ती सरलं आयुष्य कित्ती उरलं याची काहीच कल्पना नाही.
आपल आयुष्य ईतराना किती सुगंध देउन गेल याची गणना करन सुद्धा जमतं नाही.
पण तो प्रवास तरी सुगंधित आणि मनमोकळा व्हावा एवढीच ईच्छा.

( माझी सखी प्रज्ञाच्या मनातील भाव माझ्या शब्दांत.)

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...